Wednesday, 29 June 2016

नमस्कार लाईव्ह २९-०६-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- तुर्कीत विमानतळावर आत्मघाती हल्ला, 36 जणांचा मृत्यू 
२- तुर्कीतील इस्तंबूल विमानतळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व का 
३- टर्की मधल्या भारतीयांसाठी इर्मजन्सी नंबर 
४- पाकिस्तानी वृत्तसंस्था एपीपीमध्ये हिंदू पत्रकारा बरोबर भेदभाव 
५- NIAने हैदराबादमध्ये केले इसिसचे मॉड्यूल उध्वस्त, ११ जणांना अटक 
६- पाककडून अमेरिकेत 'लॉबिस्ट'चा शोध
७- पाकमध्ये हिंदू पत्रकाराला दुजाभावाची वागणूक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
८- सरकारी कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाला मंजुरी 
९- मी पप्पांना सांगितलं होतं की पास करा, त्यांनी टॉपर बनवलं : रुबी राय 
१०- रहाटकरांनी आधी मदरशात अभ्यास करावा : एमआयएम 
११- घरीच वीज तयार करा आणि पैसे कमवा; शासनाची नेट मिटरिंगला मंजुरी 
१२- ताडोबातील माया वाघीण आता टपाल तिकिटावर 
१३- हिंदू महासभेच्या अध्यक्षांना झेड दर्जाची सुरक्षा 
१४- सोशल मिडिया मेसेजिंग अॅप्सवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१५- पीक कर्ज कसं मिळतं? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती 
१६- शिवसेनेने कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा... जशास तसे उत्तर 
१७- उद्योगनगचा पाहुचार घेऊन पालखी पुण्याकडे 
१८- पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’ 
१९- रिसोड - येथे असलेल्या 16 अनाधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- मुंंबईत लोकलच्या टपावर थरारक स्टंटबाजी 
२१- मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, लोकलची स्थिती काय 
२२- अंगावर चिखल उडाल्याने नागपुरात 17 वर्षीय तरुणावर हल्ला 
२३- तेलंगणाला याड लावणारा महाराष्ट्राच्या दगडखाणीतला हिरा! 
२४- जळगाव जिल्ह्यातील सावखेडा सूटवा नाल्याला पूर 
२५- सोलापूर; विद्यार्थी घेताहेत चक्क महापालिका शाळेत प्रवेश 
२६- एनआयएचे हैदराबादमध्ये छापे; स्फोटके जप्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- हृतिक रोशन इस्तंबुल हल्ल्यातून थोडक्यात बचावला 
२८- प्रो कब्बडी: पुणे-दिल्लीत थरारक खेळ, सामना बरोबरीत सुटला 
२९- विमेन्स कबड्डी चॅलेन्जचा नारळ फुटला, फायरबर्डसचा दणदणीत विजय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
======================================

सरकारी कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाला मंजुरी

सरकारी कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन, सातव्या वेतन आयोगाला मंजुरी
नवी दिल्ली : मोदी सरकारने अखेर  केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. कॅबिनेटने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना 23.55 टक्के पगारवाढ मिळणार आहे.

एक जानेवारी 2016 पासून शिफारशी लागू होतील. वेतन आयोग लागू झाल्यामुळे सुमारे 98 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये 52 लाख पेन्शनधारकांचाही समावेश आहे.

आयोगाने मूळ वेतनात जवळपास 15 टक्के वेतनवाढ करण्याची शिफारस केली होती. नोव्हेंबर 2015 मध्ये वेतन आयोगाने केंद्राला शिफारसी सादर केल्या होत्या. यामध्ये मूळ वेतनात 14.27 टक्के वेतनवाढ करण्याची तरतूद केली होती.
आयोगाच्या शिफारशींमध्ये प्रस्तावित भत्त्यांचा समावेश केल्यास तब्बल 23.55 टक्के वेतनवाढ होणार आहे. त्यामुळे  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात 18 ते 30 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सहावा वेतन आयोग लागू करताना 2008 साली 20 टक्के वेतनवाढीची शिफारस करण्यात आली होती. सरकारने वेतन आयोग लागू करताना आयोगाच्या शिफारसींपेक्षा दुप्पट वेतनवाढ केली होती.
======================================

हृतिक रोशन इस्तंबुल हल्ल्यातून थोडक्यात बचावला

हृतिक रोशन इस्तंबुल हल्ल्यातून थोडक्यात बचावला!
इस्तंबुल : तुर्कीच्या इस्तंबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. हल्ल्याच्या काही काळ आधी हृतिक विमानतळावरच होता. तो तिथून निघाल्यानंतर हल्ला झाला. याची माहिती स्वत: हृतिकने ट्विटरच्या माध्यमातून दिली.
======================================

पीक कर्ज कसं मिळतं? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती

पीक कर्ज कसं मिळतं? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?
मुंबई: सध्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी काही शेतकरी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन कर्जासाठी अर्ज करत आहेत. तर काही जुन्या कर्जाचं पुनर्गठण करुन घेत आहेत. मात्र कर्जाची ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याचा शेतकऱ्यांचा समज आहे. पीक कर्ज नेमकं मिळतं तरी कसं?

शेतकऱ्याला सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून पीककर्ज मिळतं. यासाठी बँकेचा खातेदार होणं गरजेचं आहे. जुने खातेदार थेट पीककर्जासाठी अर्ज करु शकतात. यासाठी तलाठ्याकडून काही कागदपत्रं मिळवावी लागतात.

पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रं
*नमुना ८ अ उतारा
*७-१२ उतारा
*सोसायटीचा कर्ज नसलेला दाखल
*परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचं प्रमाणपत्र (नो ड्युज सर्टिफिकेट)
एक लाखापर्यंतच्या कर्जासाठी इतकी कागदपत्रं पुरेशी आहेत. त्यापेक्षा जास्त कर्ज हवं असल्यास, वरील कागदपत्रांसह पुढील कागदपत्रं आवश्यक आहेत.
*शेतीचा नकाशा
*बेबाकी/हैसियत प्रमाणपत्र (अन्य कोणत्या बँकेचं कर्ज नसल्याचा दाखला)
*ओलीताचं प्रमाणपत्र
*चतु:सीमा प्रमाणपत्र
*कृषी उत्पन्नाचा दाखला

ही कागदपत्र विनामूल्य तलाठ्याकडून शेतकऱ्यांना मिळतात. याशिवाय शेतकऱ्यांना चार फोटोचीही गरज भासते.

दरवर्षी शेतीचा खर्च वाढत असतो. त्यामुळं दरवर्षी २० टक्के वाढीव पीककर्ज मिळतं. प्रत्येक पिकाला किती कर्ज द्यायचं याचे निकष ठरलेले असतात. कोरडवाहूला एकरी ८ हजार आणि ओलीताच्या शेतीला १६ हजाराचं पीककर्ज मिळतं. यंदा ज्या शेतकऱ्यांना जुनं पीककर्ज फेडता आलेलं नाही त्यांनी कर्जाचे हप्ते कमी करुन घेतले आहेत..तर ज्यांना तातडीचं कर्ज मिळवायचं आहे त्यांच्यासाठी कमी व्याजदरात सोने तारण कर्जाचा पर्याय उपलब्ध आहे.

यंदाच्या नवीन निर्णयानुसार शासनानं पीक कर्जावरील अडीच लाखांपर्यंत स्टँप ड्युटी माफ केली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना घेता येणार आहे. सोबत २०१५ नंतरच्या पीककर्जाचं पुनर्गठणही केलं जात आहे.

पीककर्ज घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. ज्या शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन कर्ज घेतली आहेत त्यांनी बँकेत कर्ज परतफेडीची नोंद झाली आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी, ७-१२ आणि ८ अ च्या उताऱ्यावर कर्जाची नोंद व्यवस्थित झाली की नाही हे तपासून पाहावं. बँक किंवा सोसायटीकडून घेतलेलं कर्ज आणि व्याजाची आकारणी याची आकडेवारी जुळते की नाही याचीही तपासणी करुन घ्यावी. पीक कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण ७ ते ८ दिवसात पीक कर्ज मंजूर होतं. त्यामुळं शेतकऱ्याला सावकाराच्या पाशात अडकावं लागत नाही.
======================================

मी पप्पांना सांगितलं होतं की पास करा, त्यांनी टॉपर बनवलं : रुबी राय

मी पप्पांना सांगितलं होतं की पास करा, त्यांनी टॉपर बनवलं : रुबी राय
पाटणा : मला बारावी परीक्षेत फक्त पास व्हायचं होतं, पण पप्पांनी मला टॉपर बनवलं, असं बिहारमध्ये कला शाखेची बनावट टॉपर रुबी रायने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं.
विज्ञान शाखेतून सौरभ श्रेष्ठ आणि राहुल तर कला शाखेतून रुबी ही विद्यार्थिनी पहिली आली होती.
बिहारमधील टॉपर घोटाळ्याची चौकशी एसआयटी करत आहे. एसआयटीने बोर्ड कार्यालयातून रुबी राय अटक केली. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली असून तिची रवानगी बेऊर कारागृहात करण्यात आली आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रुबी रायने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, “मी पप्पांना म्हणाले होते की पास करा, त्यांनी तर टॉपर बनवलं. शिवाय बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका मी स्वत: लिहिली नव्हती.”
======================================

मुंंबईत लोकलच्या टपावर थरारक स्टंटबाजी

VIDEO : मुंंबईत लोकलच्या टपावर थरारक स्टंटबाजी
मुंबई : लोकलच्या टपावरुन स्टंटबाजी करताना अनेकांना जीव गमवावे लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. लोकलच्या टपावर उभं राहून अशीच स्टंटबाजी करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
 
पश्चिम रेल्वेवर एक तरुण लोकलच्या टपावरुन स्टंटबाजी करतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडोओ नेमका कधीचा आहे याचा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.


तुम्ही चुकूनही अशी स्टंटबाजी करु नका. किंवा एखादी व्यक्ती लोकलच्या टपावर चढून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला रोखा.
======================================

रहाटकरांनी आधी मदरशात अभ्यास करावा : एमआयएम

रहाटकरांनी आधी मदरशात अभ्यास करावा : एमआयएम
नवी दिल्ली : मुस्लिम धर्मियांमधील ट्रिपल तलाक पद्धतीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्यामुळे ट्रिपल तलाक पद्धतीवर काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचं आहे.
 
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नुसार तीन वेळा तलाक म्हटल्यानंतर महिलेला घटस्फोट दिला जातो. या प्रकाराला मुस्लिम धर्मियातील काही महिलांनी विरोध केला आहे. या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनाही मुस्लिम महिलांनी पत्र लिहिलंय. त्यानंतर राहटकर यांनी मोदींची वेळ मागितलीय.
======================================

मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, लोकलची स्थिती काय

मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस, लोकलची स्थिती काय?
मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरुच आहे. बुधवारी सकाळपासून मुंबईतील उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली.


मुंबईतल्या कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, वांद्रे या उपनगरात आज मुसळधार पाऊस झाला. अंधेरी आणि कुर्ला उपनगरात अर्ध्या तासातच 11 मिलिमीटर पावसाची नोंद केली गेली. मात्र यामुळे रस्ते आणि लोकल वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाहीय.
======================================

अंगावर चिखल उडाल्याने नागपुरात 17 वर्षीय तरुणावर हल्ला

अंगावर चिखल उडाल्याने नागपुरात 17 वर्षीय तरुणावर हल्ला
प्रातिनिधीक फोटो
नागपूर : नागपुरात गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे भीती व्यक्त केली जात असतानाच हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. चिखल उडाल्यामुळे तिघा जणांनी 17 वर्षीय मुलावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
 
तिघे आरोपी रस्त्यावरुन जात असताना तरुणाच्या बाइकमुळे त्यांच्या अंगावर चिखल उडाला. या रागाच्या भरात त्यांनी तरुणाला थांबवलं. यावेळी झालेल्या क्षुल्लक वादावादीनंतर त्यांनी तरुणाला जबर मारहाण केली. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगा अक्षय सहारे गंभीर जखमी झाला आहे.
 
मंगळवारी मध्यरात्री नागपुरातील गोळीबार चौकावर ही घटना घडली. घटनेनंतर तिन्ही हल्लेखोर पसार झाले असून जखमी तरुणावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
======================================

तुर्कीत विमानतळावर आत्मघाती हल्ला, 36 जणांचा मृत्यू

तुर्कीत विमानतळावर आत्मघाती हल्ला, 36 जणांचा मृत्यू
फोटो सौजन्य : रॉयटर्स
इस्तंबुल : तुर्कीमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात जवळपास 36 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून दीडशेहून अधिक जण जखमी झालेत.
 
तुर्कस्तानच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झालाय. विमानतळावर तीन आत्मघाती हल्ले करण्यात आले. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. हा हल्ला दहशतवादी संघटना आयसिसनं केल्याची शक्यता तुर्की सरकारनं वर्तवली आहे.
 
इस्तंबुल विमानतळावरुन मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. हल्ल्यातील मृतांचा आकडा 50 पर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
======================================

तुर्कीतील इस्तंबूल विमानतळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व का

तुर्कीतील इस्तंबूल विमानतळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व का?
इस्तंबुल : तुर्कीमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात जवळपास 36 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून दीडशेहून अधिक जण जखमी झालेत.
 
इस्तंबूलचा अतातुर्क विमानतळ लंडनच्या हिथ्रो आणि पॅरिसच्या चार्ल्स द गॉल विमानतळांनतर युरोपातला तिसरा सर्वात व्यस्त विमानतळ आहे.  इस्तंबूल शहराचा काही भाग आशिया खंडात तर काही युरोप खंडात आहे.
 
रशियासोबत तुर्कस्तानच्या वादामुळे रशियन पर्यटकांची संख्या रोडावल्यावरही गेल्यावर्षी सहा कोटींहून अधिक प्रवाशांनी अतातुर्क विमानतळावरुन ये-जा केली. तुर्कस्तान हा खरंतर शांत आणि सुरक्षित देश मानला जायचा, पण गेल्या काही महिन्यांपासून अंकारा आणि इस्तंबूल या तुर्कस्तानातील दोन मोठ्या शहरांत वारंवार दहशतवादी हल्ले झाले आहेत.
======================================

प्रो कब्बडी: पुणे-दिल्लीत थरारक खेळ, सामना बरोबरीत सुटला

प्रो कब्बडी: पुणे-दिल्लीत थरारक खेळ, सामना बरोबरीत सुटला
मुंबई: प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली संघांमधला सामना हा 27-27 असा बरोबरीत सुटला. यंदाच्या मोसमात बरोबरीत सुटलेला हा पहिलाच सामना आहे. उभय संघांमधला हा सामना अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत रंगला.

या सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत दबंग दिल्लीकडे 27-26 अशी एका गुणाची आघाडी होती. पण दिल्लीच्या मेराज शेखची अखेरची चढाई ही डू ऑर डाय रेड होती. त्यामुळं मेराजला कोणत्याही परिस्थितीत एक गुण आणणं गरजेचं होतं. पण पुण्याच्या खेळाडूंनी मेराजची जबदरस्त पकड करुन सामन्यात 27-27 अशी बरोबरी साधली.

पुण्याकडून मनजीत चिल्लर आणि दीपक हुडानं प्रत्येकी सात गुणांची कमाई केली. तर दबंग दिल्लीसाठी काशिलिंग आडके, सचिन शिंगाडे आणि दीपक नरवालनं प्रत्येकी पाच गुण वसूल केले.
======================================

विमेन्स कबड्डी चॅलेन्जचा नारळ फुटला, फायरबर्डसचा दणदणीत विजय

विमेन्स कबड्डी चॅलेन्जचा नारळ फुटला, फायरबर्डसचा दणदणीत विजय
फोटो सौजन्य: प्रो कबड्डी (ट्विटर)
मुंबई: प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर विमेन्स कबड्डी चॅलेन्जचा नारळ फुटला. सलामीच्या सामन्यात ममता पुजारीच्या फायरबर्डसनं अभिलाषा म्हात्रेच्या आईस डिवाजचा 25-12असा धुव्वा उडवला.

मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात फायरबर्डस संघानं अगदी सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं.

फायरबर्डकडून ममता पुजारी आणि पायल चौधरीनं प्रत्येकी पाच गुणांची वसूली केली. तर आईस डिवाजसाठी खुशबू नरवाल आणि सोनाली शिंगाटेनं प्रत्येकी चार गुणांची कमाई केली. आयोजकांनी महिलांचे कबड्डी सामने सुरु केल्यानं महिला खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे.
======================================

शिवसेनेने कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा...

“शिवसेनेने कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा...”
मुंबई शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रक्षोभक गोष्टींनंतरही भाजपा कार्यकर्ते शांत आहेत, याचा कुठलाही दुसरा अर्थ कोणी काढत असेल तर तो गैरसमज असून, जशास तसे उत्तर देण्यास भारतीय जनता पार्टी समर्थ आहे, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेनेला दिला आहे.

शिवसेनेने कार्यकर्त्यांना आवरावं, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ

“पुतळे जाळणे, वृत्तपत्राची होळी करणे या गोष्टी भाजपाही करू शकते, परंतु सत्तेत एकत्र असल्याचे भान ठेवून आम्ही शांत आहोत. परंतु, आमच्या संयमाची परीक्षा कोणीही पाहू नये. शिवसेना नेत्यांनी जर त्यांच्या कार्यकर्त्यांना आवरले नाही तर जी स्वाभाविक प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्त्यांकडून होईल.” असा इशाराच ठाकूर यांनी शिवसेनेला दिला आहे.

“सामना या मुखपत्रातून सातत्याने भाजपा नेते व सरकारवर विनाकारण व द्वेषमूलक टीका करण्यात येते. भाजपा सरकार हे निझामाच्या बापाचे सरकार असल्याची टीका प्रथम शिवसेनेच्याच नेत्याने जाहीरपणे केली. त्याला भाजपाच्या मनोगतमध्ये एकदा प्रत्युत्तर देण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला”, असेही ठाकूर म्हणाले.
======================================

बालाजी मंजुळे : तेलंगणाला याड लावणारा महाराष्ट्राच्या दगडखाणीतला हिरा!

बालाजी मंजुळे : तेलंगणाला याड लावणारा महाराष्ट्राच्या दगडखाणीतला हिरा!
तेलंगणा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ‘मंजुळे’ या नावानं याड लावलंय. मंजुळे हे आडनाव ऐकलं की सर्रकन पिस्तुल्या, फॅन्ड्री आणि सैराट डोळ्यासमोर येतो. पण तेलंगणात महाराष्ट्रातील असा एक मंजुळे आहे, ज्याने तेलंगणातील परिस्थितीने पिचलेल्या गोरगरिबांना याड लावलंय.

एखाद्याला एखाद्या गोष्टीचे याड लागलं की काय काय होतं, याची अनेक उदाहरणे आहेत. बालाजी मंजुळेंनाही शालेय वयात असाच याड लागलं. पण हे याड होत अभ्यासाचं, हे याड होतं आईचं स्वप्न पूर्ण करण्याचं!

आईचं स्वप्न.. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द!

बालाजी मंजुळे वडार समाजाचे. आई-वडील पारंपरिक काम अर्थात रस्त्यावर दगड फोडण्याचं काम कारायचे. त्यातून बालाजी यांचे वडील दिगंबर मंजुळे हे त्यांची पत्नी पार्वती आणि 7 मुलांचे संगोपन कारायचे. रस्त्यावर दगड फोडताना एकदा एक लाल दिव्याच्या गाडीतून साहेब आला. कामाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करून निघून गेला. त्याचवेळी पार्वतीबाईंच्या डोळ्यात एक स्वप्न तरले. आपल्या बालाजीनेही लाल दिव्याच्या गाडीत बसणारा साहेब होण्याचं. आईने आपली इच्छा बालाजी यांना बोलून दाखवली. मग काय बालाजी यांनीही हलाखीची परिस्थिती असताना याड लागल्यागत अभ्यास केला. त्यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून 56 वा क्रमांक मिळवला.

balajiवयाच्या 24 व्या वर्षी आयएएस!
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. 2010 सालापर्यंत घरात वीज नाही. मग अभ्यास कसा करणार? पण बालाजी यांनी दिव्याच्या उजेडात अभ्यास केला. त्यामुळे एक डोळ्याची दृष्टी गेली. अपंग कोट्यातून परीक्षेत अजून वरचा क्रमांक येऊ शकला असता, पण बालाजी यांनी त्याचा फायदा घेतला नाही. वयाच्या 24 व्या वर्षी बालाजी आयएएस झाले. एक डोळ्याने अधू असूनही जीवनाकडे आणि उपलब्ध परिस्थिती सकारात्मक नजरेने पाहिले पाहिजे असे ते आवर्जून सांगतो.
======================================

घरीच वीज तयार करा आणि पैसे कमवा, शासनाची नेट मिटरिंगला मंजुरी

घरीच वीज तयार करा आणि पैसे कमवा, शासनाची नेट मिटरिंगला मंजुरी
मुंबईः सर्वसामान्यांचा वीज बिलाचा त्रास आता कमी होणार आहे. नेट मिटरिंग सिस्टीम या योजनेनुसार आता घरीच वीज तयार करुन ती महावितरणला विकता येणार आहे, शासनाने या संबंधातील अध्यादेश काढला आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्मद्वारे सोलार प्लांटसाठी अर्ज करता येत आहे.

सौरऊर्जानिर्मीतीची परवानगी आतापर्यंत केवळ मोठ्या उद्योगांनाच होती. हा अडसर शासनाने दूर केला आहे. त्यामुळे आता निवासी, वाणिज्य आणि हाऊसिंग सोसायट्यांना आता छतावर वीजनिर्मीती करता येणार आहे. स्वतःच्या वापरानंतर उरलेली वीज महावितरणला विकता येणार आहे.
काय आहे नेट मिटरींग सिस्टीम?
नेट मिटरींगमध्ये इन्वर्टर, ट्रान्सफार्मर आणि विद्युत मिटर यांच्या साहाय्याने घराच्या छतावर सोलार पॅनेल्स लावले जातात. पॅनल्सच्या माध्यमातून वीजनिर्मीती होते. शहरी भागाप्रमाणेच नेट मिटरींग ही योजना उपयुक्त आहे.

net meter

एका सौर प्रकल्पाद्वारे एक हजार युनिच वीजनिर्मीती होत असेल आणि घरगुती वीज वापर नियमित 200 युनिट असेल तर उर्वरित 800 युनिट वीज महावितरणला विकता येते. महावितरणने युनिटचे दर ठरवुन दिले आहेत. दरवर्षी 31 मार्च रोजी ग्राहकाला महावितरण सौरऊर्जेचे शुल्क देते. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.

भारतात कुठे आहे नेट मिटरिंग?
जगात सौर ऊर्जा निर्मीतीमध्ये जर्मनी हा देश आघाडीवर आहे. भारतामध्ये सौर ऊर्जेवर वीजनिर्मीती करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. भारतातील तामिळनाडु, उत्तराखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नेट मिटरिंग सिस्टीम लागू आहे. यासाठी प्रत्येक राज्याचे स्वतंत्र कायदे आहेत. भारतामध्ये गोदावरी सीएसपी नावाचा भव्य सौर प्रकल्प आहे. भारताचं 2022 सालापर्यंत 100 गीगीवॅट वीजनिर्मीती करण्याचा मानस आहे.

solar panel-compressed

वीजबचतीसोबत आर्थिक फायदा
नेट मिटरींगमुळे वीजबिल भरण्यापासून मुक्तता होईल, हा सर्वात महत्वाचा फायदा आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्यावतीने संयत्र उपलब्ध करुन दिले जातात. त्यामुळे आपण किती किलोवॅटचा प्रकल्प उभारतो, यावर प्रकल्पाचा खर्च अवलंबून आहे.

या प्रकल्पामुळे 24 तास वीज उपलब्ध होणार आहे, शिवाय आर्थिक कमाई देखील होईल. नेट मिटरिंगमुळे प्रदुषण टाळण्यास देखील मदत होते. ग्रामीण भागात शेतीसाठी वीजेचा मोठा प्रश्न असतो, त्यासाठी देखील मदत मिळते
======================================

ताडोबातील माया वाघीण आता टपाल तिकिटावर

ताडोबातील माया वाघीण आता टपाल तिकिटावर
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘माया’ वाघिणीचं चित्र आता टपाल तिकिटावर झळकणार आहे. ‘माया’ सध्या ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे. याच मायाचं एक मायेनं भरलेलं छायाचित्र चंद्रपुरातील हौशी छायाचित्रकार अमोल बैस यांनी टिपले आणि हेच चित्र आता टपाल तिकिटाचे रूप घेणार आहे. या तिकिटाच्या निमित्ताने व्याघ्र संरक्षणासंदर्भातील जनजागृतीला नवा आयाम मिळणार आहे.

छायाचित्रकार अमोल बैस यांच्या फोटोला मान

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले आहे. पट्टेदार वाघांची भूमी म्हणून ताडोबा ओळखलं जाते. पट्टेदार वाघाचं हमखास दर्शन इथं होत असल्यानं पर्यटकांसोबतच हौशी छायाचित्रकारही मोठ्या संख्येनं इथं हजेरी लावतात. चंद्रपूरचे हौशी छायाचित्रकार अमोल बैस यांनाही फोटोग्राफीची भारी आवड. त्यांनी एक जानेवारी २०१६ रोजी ताडोबातील पांढरपौनी तलावाजवळ माया वाघिणीचं तिच्या बछड्यासह छायाचित्र काढलं. त्यानंतर अमोलनं हे छायाचित्र फेसबूकवर टाकलं आणि पाहतापाहता त्याला अडीच लाखांपेक्षा जास्त लाईक्स, 25 हजारांवर शेअर्स आणि 14 हजार प्रतिक्रिया मिळाल्या. त्यानंतर हे छायाचित्र इंग्लंडच्या ‘डेली मिरर’ वृत्तपत्रानं मुख्य पानावर प्रकाशित केलं.
Awarded Photo image
व्याघ्र दिनी माया टपाल तिकिटावर झळकणार

आजवर अनेक छायाचित्रकारांनी ताडोबातील वाघांची छायाचित्रे टिपली आहेत. पण अमोल बैस यांनी जी माया टिपली, ती इतरांना टिपता आलेली नाही. वाघासारख्या हिंस्त्र पशुचे वात्सल्याने ओतप्रोत हे चित्र त्यामुळे फेसबुक वर तुफान लोकप्रिय ठरले. या फोटो च्या लोकप्रियतेची माहिती मिळाल्यावर चंद्रपूरचेच असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे छायाचित्र टपाल तिकिटावर यावे, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांनी अनेक देशी-विदेशी पाहुण्यांनाही हेच छायाचित्र भेट म्हणून दिलं आहे. या माध्यमातून वन्यजीव आणि जंगल या दोन्ही घटकांची माहिती जनतेपर्यंत जावी आणि संवर्धनासाठी मदत व्हावी, यासाठी टपाल तिकिटावर 29जुलै म्हणजेच व्याघ्र दिनी तिचा फोटो पोस्टाच्या तिकिटावर छळकणार आहे.

ताडोबा-जंगलात प्राण्यांना नावे देण्याची एक अलिखित प्रथा आहे. माया या वाघिणीला देखील अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी माया हे नाव देण्यात आलं. पांढरपौनी भागात आपल्या बछड्यासह भटकणारी ही माया पर्यटकांना कधीच निराश करीत नाही. त्यामुळंच तिचे हजारो फोटो सोशल साईट्स वर उपलब्ध आहेत. मात्र अमोल बैस यांनी काढलेल्या फोटो ने तिचे “माया” हे नाव ख-या अर्थाने सार्थ ठरले आहे.
======================================

टर्की मधल्या भारतीयांसाठी इर्मजन्सी नंबर


  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. २९ - तीन दहशतवाद्यांनी मंगळवारी इस्तंबुलच्या अतातुर्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत ३६ जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक टर्कीश नागरीक असले तरी, काही परदेशी नागरीकही आहेत असे अधिका-याने सांगितले. 
     
    या हल्ल्यात अद्यापपर्यंत तरी कोणी भारतीय जखमी झाल्याचे वृत्त आलेले नाही. टर्कीमधील भारतीयांना तात्काळ कोणतीही मदत हवी असल्यास भारत सरकारने इर्मजन्सी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. 
    कुठल्याही भारतीयाला मदत हवी असल्यास तो या क्रमांकवर फोन करु शकतो. 
    +90-530-5671095/8258037/4123625
======================================

पाकिस्तानी वृत्तसंस्था एपीपीमध्ये हिंदू पत्रकारा बरोबर भेदभाव


  • ऑनलाइन लोकमत 
    इस्लामाबाद, दि. २९ - पाकिस्तानी वृत्तसंस्थेत काम करणा-या एका हिंदू पत्रकाराला अन्य सहकारी पत्रकार भेदभावाची वागणूक देत असल्याची घटना समोर आली आहे. साहीब खान ओद असे या पत्रकाराचे नाव असून, धर्माच्या आधारावर एपीपी या वृत्तसंस्थेत त्याला भेदभावपूर्ण वागणूक दिली जात आहे. 
     
    एक्सप्रेस ट्रीब्युनच्या वृत्तानुसार साहीब खान ओदला मुस्लिम सहका-यांनी वापरलेल्या ग्लासमधून पाणी पिण्यास तसेच त्यांची भांडी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ओद दादू जिल्ह्यातील असून, त्याची आधी इस्लामाबादला रिपोर्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर हैदराबादला त्याचे ट्रान्सफर झाले आणि यावर्षी एप्रिलमध्ये पुन्हा कराचीमध्ये नियुक्ती करण्यात आली. 
     
    ओदचा मुलगा राज कुमार कामानिमित्ताने त्याच्या कार्यालयात आला होता. त्यावेळी ओद हिंदू असल्याचे त्याच्या सहका-यांना समजले. तेव्हापासून ओदला भेदभावाची वागणूक दिली जात आहे. माझ्या नावात खान असल्यामुळे सुरुवातीला सगळयांना मी मुस्लिम असल्याचे वाटले होते. पण माझा मुलगा कार्यालयात आल्यानंतर मी हिंदू असल्याचे समजले. 
======================================

उद्योगनगचा पाहुचार घेऊन पालखी पुण्याकडे


  • ऑनलाइन लोकमत
    पिंपरी, दि. २९ -  पिंपरी-चवडकराचा पाहुणाचार घेऊन टाळ-मृदंगाचा जयघोष आणि हरिनामाचा गजर करीत संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखीसोहळा बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाला. गेल्या दोन दिवसापासून  आल्हाददायक वातावरण आहे. विठूनामाचा गजर अखंडपणे सुरु आहे. आकुर्डीतील मुक्काम करून सकाळी सातलाला सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी पहाटे सहाला महापूजा झाली. या वेळी देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे, सोहळाप्रमुख सुनील मोरे, अशोक नि. मोरे, अशोक मोरे आदी उपस्थित होत्या. 
    महापूजेनंतर  त्यानंतर आकुर्डीकराचा निरोप घेऊन वैष्णव वारीची वाट चालू लागले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधून-मधून हलक्याशा पावसाच्या सरी बसरत होत्या.   वारकºयांच्या स्वागतासाठी कक्ष उभारलेले होते.  सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन,  पिंपरी एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिरात पहिला विसावा झाला. कामगार नगरीने वारकर्यांची मनोभावे सेवा केली. त्यानंतर दापोडीत दुपारचा विसावा होणार असून, बोपोडी, खडकी, वाकडेवाडीमार्गे सोहळा पुण्यात आज सायंकाळी मुक्कामासाठी थांबणार आहे.
======================================

जळगाव जिल्ह्यातील सावखेडा सूटवा नाल्याला पूर

  • First Published :29-June-2016 : 09:34:18

  •  ऑनलाइन लोकमत 
    जळगाव, दि. २९ - मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील सावखेडा सूटवा नाल्याला पूर आला असून, शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तापी नदीही पाण्याने दुथडी वाहू लागली आहे. 
     
    तापीतील निगव्हान येथे नदी पात्रात वाळू बटुक करणारे पोकलॅंड आणि डंम्पर अडकून पडले आहेत. वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि डंम्पर व पोकलॅंड अडकले आहेत. 
     
    pani 4
======================================

पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’


  • औरंगाबादपासून अवघ्या ३६ किलोमीटरवर असलेले म्हैसमाळ म्हणजे मराठवाड्याचे ‘महाबळेश्वरच’ म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हैसमाळ म्हणजे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ... वनस्पतिशास्त्राची येथे जणू प्रयोगशाळाच वसलेली आहे. तुम्हाला येथे विविध प्रकारच्या वनस्पती, फुलांचे प्रकार पहायाला मिळतील. पावसाळा अन् हिवाळ्यात तर जणू स्वर्गच धर्तीवर उतरल्याचा अनुभव येतो. मान्सूनमध्ये तर येथील डोंगर- दऱ्यांमध्ये पसरलेला हिरवा गालिचा अन् पायाशी लोळणारे ढग हे डोळ्याचे पारणे फेडतात...
    म्हैसमाळ सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडचा भाग आहे. या परिसराला सुंदर, विलक्षण पर्वतरांग लाभलेली आहे. मराठवाड्यातील हे मिनी महाबळेश्वर एका उंच पठारावर चहूकडे सर्वदूर पसरलेले आहे. या पठाराच्या मधून जाणारी डांबरी सडक पठार विभागून उत्तरेकडच्या टोकापर्यंत जाते. पावसाळ्यात अधून- मधून सतत कोसळणाऱ्या मुसळधार, रिमझिम पावसाच्या सरी, हिरव्यागार खोल दऱ्या, प्रसन्न करणारी हवा, मनमोहक व्ह्यू- पॉर्इंट, घनदाट झाडी, जागोजागी चढ- उतारांच्या पाऊलवाटा... त्यातच मधोमध असलेला गिरजा तलाव, हे चित्र डोळ्याचे पारणे फेडते. येथील व्ह्यू- पॉर्इंटस्वरून जवळजवळ ३० किलोमीटर इतका दिसणारा आसमंत एखाद्या चित्रासारखा भासतो. दऱ्या- खोऱ्यातील रेखीव शेती, मध्ये असलेली छोटी घरे, जागोजागी दिसणारे जंगलांचे पुंजके आपल्या मनात घर करून जातात. पावसाळ्यात तर जणू स्वर्गच धरतीवर उतरला आहे की काय, अशी अनुभुती येथे मिळते. 
    येथील समशीतोष्ण हवामान आपल्याला हवेहवेचे वाटते. आकडेवारीनुसार येथील तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, तर किमान तापमान साधारणपणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे वर्षभरात कधीही यावे, असे हे पर्यटनस्थळ आहे. 
    वनविभागाने पूर्वीपासूनच वनपर्यटनाचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन येथे सुनियोजित विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे म्हैसमाळच्या आजूबाजूला अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणी उदयास आली आहे, जी पर्यटकांचे आकर्षण ठरली आहेत. येथील दूरदर्शनच्या मनोऱ्याजवळून दिसणारा अप्रतिम देखावा अजिबात चूकवू नये, असाच आहे. छोटछोटे तलाव, जंगल, दऱ्यांनी नटलेले हे विस्तीर्ण पठार एकदा तरी नक्कीच भेट देण्यासारखे आहे. 
     
    धार्मिक स्थळही
    म्हैसमाळ हे शिवाच्या एका जुन्या मंदिराच्या अवशेषाचेही ठिकाण आहे. त्यामुळे भागाचे मुळ नाव महेशमाळ होते. अपभ्रंश होऊन कालांतराने महेशमाळचे म्हैसमाळ नाव पडले. या परिसराच्या मधोमध गिरजा देवीचे मंदीर आहे. हे मंदीर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. याच पठारावर आता एक बालाजी मंदीरही वसविण्यात आले आहे. हे मंदीरही पाहण्यासारखेच आहे. म्हैसमाळपासून अवघ्या बारा किलोमीटरवर असलेले खुलताबादेत देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारोतीचे विशाल मंदीर आहे. याच खुलताबादेत मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या महमंद पैगंबरांच्या मिशीचा केस ठेवलेला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांसाठीही हे एक पवित्रस्थान मानल्या जाते. शिवाय जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या, बारा जोर्तीलिंगांपैकी एक असलेले घृष्णेश्वरचे मंदीर आणि दौलताबादचा किल्लाही येथून अवघ्या १४ ते १५ किलोमीटर अंतरावरच आहे. 
     
======================================

NIAने हैदराबादमध्ये केले इसिसचे मॉड्यूल उध्वस्त, ११ जणांना अटक


  • ऑनलाइन लोकमत
    हैदराबाद, दि. २९ - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी तेलंगणातील हैदराबादमध्ये छापा मारून कुख्यात दहशतवादी संघटना इसिसचे मॉड्यूल उध्वस्त करत ११ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच या ठिकाणाहून अधिका-यांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि १५ लाख रुपये जप्त केले.
    पोलिस अधिका-यांच्या माहितीनुसार, पकडलेले गेलेले हे सर्वजण काही संशयित कारवाईत गुंतले असून ते सीरियातील त्यांच्या प्रमुखाशी संपर्कार राहून हैदराबाद व भारतात मोठ्या प्रमाणात घातपाताच्या कारवाई करण्याच्या तयारीत होते. एनआयए अधिका-यांनी शहरातील विविध भागांत छापेमारी केली असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. 
    दरम्यान या वर्षाच्या सुरूवातीलाच एनआयएने असेच काही छापे मारून इसिसशी जोडल्या गेलेल्या १४ संशियतांना अटक केली होती, त्यापैकी दोघांना हैदराबादमधूनच अटक झाली होती. 
======================================

पाककडून अमेरिकेत 'लॉबिस्ट'चा शोध


  • इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दोन मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागल्यानंतर, आता पाककडून अमेरिकेत लॉबिस्टचा (प्रचारक) शोध सुरू झाला आहे.
    मागील काही दिवसांत घडलेल्या दोन घटना पाकिस्तानला लॉबिस्टचा शोध करण्यास भाग पाडत आहेत. अमेरिकेने पाकला एफ-१६ विमानाच्या व्यवहारात सूट देण्यास नकार दिला, तर भारताच्या एनएसजी सदस्यत्वाबाबत अमेरिकेने भारताला जाहीर पाठिंबा दिला.
    अमेरिका व पाक यांच्यात मतभेद वाढले आहेत. अफगाणिस्तानात तालिबानशी कसा संघर्ष करायचा? याबाबतही मतभेद आहेत. अमेरिकेने पाकिस्तानवर आरोप केलेला आहे की, अतिरेकी संघटनांचा नायनाट
    करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे. वॉशिंग्टनस्थित पाक दूतावासाचे प्रवक्ते नदीम होतियाना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
======================================
विद्यार्थी घेताहेत चक्क महापालिका शाळेत प्रवेश

सोलापूर - शिक्षणाचा वाढता खर्च आणि हजारो रुपये खर्चूनही पाल्याच्या गुणवत्तेत काहीच प्रगती न दिसल्याने तब्बल 281 पालकांनी आपल्या मुलांना महापालिकेच्या शाळेत घातले आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांना "अच्छे दिन‘ आले आहेत.

महापालिकेची शाळा म्हटले की गोरगरिबांची आणि गुणवत्ता चांगली नसल्याची शाळा असा समज पालकांमध्ये होता. विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या नसल्याने काही शाळांमध्ये एकच शिक्षक चार-चार वर्गावर शिकवत असत. ही स्थिती पाहून केवळ मध्यमवर्गीय पालकांनीच नव्हे तर, करून खाणाऱ्या पालकांचाही ओढा खासगी शाळांकडे होता. मात्र आता चित्र बदलले आहे. आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली बहुतांश खासगी शाळांमुळे पालकांची आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. गणवेश, बूट आणि आवश्‍यक साहित्य हे शाळेतूनच किंवा शाळेने शिफारस केलेल्या दुकानातूनच घेतले जावे, यासाठी सक्ती केली जाते. त्यामुळे इतर दुकानात पाच-पंचवीस रुपयांना मिळणारी वस्तू शाळेने शिफारस केलेल्या दुकानात 40 ते 50 रुपयांना घ्यावी लागते. हा भुर्दंड पालकांना सोसावा लागतो. या उलट पालिकेच्या शाळेत सर्वकाही मोफत मिळते. 
======================================
पाकमध्ये हिंदू पत्रकाराला दुजाभावाची वागणूक

कराची (पाकिस्तान) - पाकिस्तानमधील सरकारी वृत्तसंस्थेमधील एका हिंदू पत्रकाराला सहकाऱ्यांकडून भेदभावाची वागणूक देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पाकिस्तानमधील असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तानमध्ये (एपीपी) साहिब खान ओद नावाचा हिंदू पत्रकार कार्यरत आहे. त्याच्या मुस्लिम सहकाऱ्यांना त्याची जात वेगळी असल्याचे समजल्यानंतर ते त्याला वेगळी वागणूक देत आहेत. इतर सहकारी पाणी पित असलेल्या ग्लास आणि जेवणाची भांडे (ताट, वाटी वगैरे) वापरण्यास त्याला बंदी करण्यात आली आहे. ओद दादू जिल्ह्यातील निवासी असून सुरुवातीला तो इस्लामाबादमध्ये बातमीदार म्हणून रूजू झाला होता. त्यानंतर त्याची हैदराबादला बदली करण्यात आली आणि यावर्षी एप्रिलमध्ये त्याला पुन्हा कराचीला नियुक्त करण्यात आले. 

======================================
हिंदू महासभेच्या अध्यक्षांना झेड दर्जाची सुरक्षा

नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमकडून हल्ल्याच्या प्रयत्न झाल्याने हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. 



चक्रपाणी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली. चक्रपाणी यांना अलिकडेच "डी कंपनी‘कडून धमक्‍या येत होत्या. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून कळविले होते. यापूर्वीच त्यांनी अशा प्रकारची सुरक्षा नाकारली होती. 9 डिसेंबररोजी स्वामी यांनी दाऊद इब्राहिमच्या मालकीच्या एक मोटार लिलावात जिंकली होती. 3 लाख 20 हजार रुपये किंमतीची ही मोटार दाऊद इब्राहिमची असल्याने स्वामी यांनी ती पेटवून दिली होती. तसेच ही मोटार केवळ जाळण्यासाठीच खरेदी केल्याचेही स्वामी यांनी म्हटले होते.
======================================
एनआयएचे हैदराबादमध्ये छापे; स्फोटके जप्त

हैदराबाद - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज (बुधवार) सकाळी हैदराबादमधील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये स्फोटके, हत्यारे, रोख रक्कम जप्त करण्यात आली असून 11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हैदराबादमध्ये दहशतवादी संबंधित कारवायांचा कट रचण्याच्या हालचाली होत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे हैदराबादमधील 10 ठिकाणी छापा टाकण्यात आला. याबाबत "एनआयए‘चे वरिष्ठ अधिकारी संजीव कुमार यांनी वृत्तसंस्थेला दूरध्वनीवर माहिती दिली. "कारवाई अद्याप सुरू असून आतापर्यंत हत्यारे, स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त केली आहे‘, अशी माहिती कुमार यांनी दिली. तसेच 11 संशयास्पद व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.

======================================

No comments: