Sunday, 12 June 2016

नमस्कार लाईव्ह १२-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १२-०६-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय] 
१- अमेरिकेत गे नाईट क्लबमध्ये गोळीबार, 25 जणांसह हल्लेखोर ठार 
२- फ्लोरिडा; म्युझिकल शो संपल्यानंतर ऑटोग्राफ देताना गायिकेची हत्या 
३- बीजिंग; "एनएसजी'संदर्भात राजकीय समन्वय हवा: चीन 
४- इस्लामाबाद; "रमझान'मध्ये जेवल्याने हिंदु नागरिकास मारहाण 
५- ढाका; प्रत्येक मारेकऱ्याला पकडूच पकडू - शेख हसीना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- 'भाजप निजाम, मग शिवसेना रझाकार आहे का?' - तरुण भारत 
७- दिल्ली; गरीबांवर उपचार न करणाऱ्या रुग्णालयांना दंड 
८- अमृतसर; चुकून भारतात आलेल्या पाकिस्तानी मुलांची सुटका 
९- दिल्ली; "जिहाद'साठी ब्रेनवॉश करणारी फिलिपिनो महिला 
१०- दिल्ली; बाबरी,गोध्राच्या बदल्यासाठी तरुण अल कायदाकडे  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
११- सरकारी बँकांचे थकीत कर्ज आणखी वाढले! 
१२- पटना; बिहारमध्ये दोन माओवाद्यांना अटक 
१३- सीबीआयकडे ठोस पुरवे असल्यामुळेच विरेंद्र तावडेला अटक केले - मुक्ता दाभेलकर 
१४- लातूर - मुरुडमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, 9 जखमी 
१६- पिंपरीत दोन दिवस टोळक्यांचा धुडगूस, 50 वाहनांचा चुराडा 
१७- भंडाऱ्यात गर्भवतीवर सलग पाच दिवस सामुहिक बलात्कार 
१८- कोल्हापूर; एसटी महामंडळातर्फे शाळेत मिळणार पास 
१९- सोलापूर - माढा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी 
२०- जळगाव; रानडुकरासाठी टाकलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- सायनाने सिडनीत फडकावला तिरंगा 
२२- बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू दगडफेकीत जखमी 
२३- 'आनंद'च्या वाढदिवसानिमित्त मंगेशकर कुटुंबिय एकत्र ! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
आत्ता आपल्या शहरामध्ये, 
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 

===================================

'भाजप निजाम, मग शिवसेना रझाकार आहे का?'

'भाजप निजाम, मग शिवसेना रझाकार आहे का?'
नागपूरः युतीत धुसफूसत असलेली पोस्टरवॉरची धग आज पुन्हा एकदा भडकली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा असणारं वृत्तपत्र तरुण भारत हे याला कारण ठरलं आहे. तरुण भारतच्या लेखातून शिवसेनेला खोचक सवाल करण्यात आला आहे.


भाजपचं सरकार निजाम असेल तर सेना सत्तेत कशी?, ज्यांनी दलित वस्त्यांवर हल्ले केले?, कसलेही आंदोलनं पुकारुन हफ्ते स्विकारले त्यांना रझाकार म्हणायचं का?, असा जहरी प्रश्न तरुण भारतमधल्या एका लेखातून सेनेला विचारला आहे.


‘बावचळलेल्या शिवसेनेचा तोल सुटलाय’ अशा मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्तंभलेखक दिलीप धारुरकर यांच्या लेखात संजय राऊतांच्या  वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे.


सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारची तुलना निजाम सरकारशी केली होती. तेव्हापासून या वादाला तोंड फुटलं आहे.
===================================

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, 9 जखमी

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, एकाचा मृत्यू, 9 जखमी
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर आणखी एका अपघाताची घटना समोर आली आहे. तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाताना तीन कारची एकमेकांना धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पनवेल-खोपोली दरम्यान हा अपघात घडला आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाढत्या अपघातांचं प्रमाण लक्षात घेता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांमध्ये तब्बल 579 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महामार्ग पोलिसांकडून ही कारवाई सुरु आहे.

गेल्याच रविवारी एक्स्प्रेस वे वर बस-कारच्या झालेल्या अपघातात 17 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या अपघातांच्या प्रमाणामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याची टीका होत आहे. त्यामुळे ही कारवाई सुरु आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने 286 तर महामार्ग पोलिसांनी एकूण 293 दोषी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. दोषी वाहनचालकांकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर 22 वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.
===================================

पिंपरीत दोन दिवस टोळक्यांचा धुडगूस, 50 वाहनांचा चुराडा

पिंपरीत दोन दिवस टोळक्यांचा धुडगूस, 50 वाहनांचा चुराडा
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र अजुनही सुरुच आहे. गेल्या दोन दिवसात टोळक्यांनी घातलेल्या धुमाकूळात 50 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

10 जूनला वाकडमध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत 20 गाड्या फोडल्या होत्या. हे प्रकरण ताजं असतानाच काल रात्री साडेनऊ वाजल्याच्या सुमारास खडकी परिसरात दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने 30 गाड्यांना लक्ष केलं.

परिसरात दहशत पसरवण्यासाठी किंवा आपापसातल्या वादातून हे प्रकार होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र या प्रकारांवर आळा घालण्यात सध्यातरी पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे आणखी किती काळ नुकसान सहन करायचं असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.
===================================

सायनाने सिडनीत फडकावला तिरंगा

सायनाने सिडनीत फडकावला तिरंगा
सिडनीः भारताची फुलराणी सायना नेहवालनं सिडनीत भारताचा तिरंगा फडकावला आहे. सायनाने ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरीजचं विजेतेपद मिळवलं आहे. सिडनीत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनानं हा विक्रम आपल्या नावावर केला.


सायनाने चीनच्या सून यूवर 11-21, 21-14, 19-21 अशी मात केली. सायनाचं हे बीडब्ल्यूएफ स्पर्धांमधलं एकूण 22 वं विजेतेपद ठरलं आहे. तर सुपर सीरीज दर्जाच्या स्पर्धांमध्ये सायनाचं हे दहावं विजेतेपद आहे.


रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरीजमधला सायनाचा हा विजय भारतीय चाहत्यांचा उत्साह वाढवणारा ठरला आहे.
===================================

भंडाऱ्यात गर्भवतीवर सलग पाच दिवस सामुहिक बलात्कार

भंडाऱ्यात गर्भवतीवर सलग पाच दिवस सामुहिक बलात्कार
भंडारा : गर्भवतीचं अपहरण करुन तिच्यावर सलग पाच दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन करडी पोलिसांनी दोन नराधमांना अटक केली आहे.

दिलीप शेंडे आणि गणेश शेंडे या दोन आरोपींनी 4 महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचं अपहरण करुन तिच्यावर आळीपाळीने सतत पाच दिवस बलात्कार केल्याचा आरोप आहे.


सुरेवाडा येथील पीडित महिला ही मोहाडी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या निलज गावात आईकडे गेली होती. तिथून सूरेवाडाला सासरी परत येत असताना तिच्या भावाने तिला करडीपर्यंत सोडलं. त्यावेळी आरोपी दिलीप शेंडेने तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिचं अपहरण केलं. ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्यावर एका जंगलात बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
===================================

अमेरिकेत गे नाईट क्लबमध्ये गोळीबार, 25 जणांसह हल्लेखोर ठार

अमेरिकेत गे नाईट क्लबमध्ये गोळीबार, 25 जणांसह हल्लेखोर ठार
फ्लोरिडा : अमेरिकेत एका गे नाईटक्लबमध्ये झालेल्या गोळीबारात तब्बल 25 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलँडोमध्ये एका गे नाईटक्लबमध्ये एका माथेफिरुनं अंदाधुंद गोळीबार केला होता.

या गोळीबारात 25 जणांचा मृत्यू झाला आहे तर 40 जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा हल्लेखोर सुरक्षारक्षकांनी केलेल्या प्रत्युत्तरात मारला गेल्याची माहिती आहे. हल्ल्याच्या वेळी शंभरहून अधिक व्यक्ती गे क्लबमध्ये उपस्थित असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.

हल्लेखोरानं सुसाईड बॉम्ब व्हेस्ट घातल्याचा संशय आल्यानं बॉम्ब निकामी करणारं पथकही घटनास्थळी दाखल झालं होतं. पल्स नाईटक्लब हे फ्लोरिडातील हॉटेस्ट गे क्लब मानलं जातं. या नाईटक्लबच्या फेसबुक पेजवर ‘पल्समधून सर्वांनी बाहेर पडा, पळत रहा’ अशी पोस्ट टाकण्यात आली.
===================================

बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू दगडफेकीत जखमी

बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू दगडफेकीत जखमी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू सध्या त्याच्या अपकमिंग अल्बम ‘सांवरे’ साठी लखनऊमध्ये आहे. या अल्बमच्या चित्रीकरणादरम्यान एका जमावाने मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात तो गंभीर जखमी झाला आहे.

लखनऊमधील इमामबाडे येथे कुणाल खेमूच्या अपकमिंग अल्बमचे शुटींग सुरु आहे. या अल्बममध्ये कुणाल खेमू सोबत मिस इंडीया ग्रॅण्ड इंटरनॅशनल २०१५ मधील वर्तिका सिंहदेखील आहे. इमामबाडे येथे शुटींग करण्याने काहींच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने त्याला विरोध होत होता.

त्यामुळे शुटींगदरम्यान एका संतप्त जमावाने सर्व टीमवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात कुणाल खेमू गंभीर जखमी झाला असून त्याच्या हातांना दुखापत झाली आहे.
===================================

म्युझिकल शो संपल्यानंतर ऑटोग्राफ देताना गायिकेची हत्या

म्युझिकल शो संपल्यानंतर ऑटोग्राफ देताना गायिकेची हत्या
फ्लोरिडा अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ओरलँडो शहरात ‘द व्हॉईस’ स्टार क्रिस्टिना ग्रिमीची हत्या करण्यात आली आहे. म्युझिकल शोनंतर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना गायिका क्रिस्टिनावर गोळीबार करणयात आला, त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान क्रिस्टिनाचा मृत्यू झाला.

अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम ‘द व्हॉईस’मध्ये सहभागी झालेली क्रिस्टिना ग्रिमीवर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना गोळीबार झाला.

हल्लेखोराला क्रिस्टिनाच्या भावाने पकडलं होतं. मात्र, क्रिस्टिनावर गोळी झाडल्यानंतर हल्लेखोराने स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या केली.

===================================

भाजपचं सरकार निजाम असेल तर सेना सत्तेत कशी?


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १२ : संघ विचारांनी प्रेरित असलेल्या तरुण भारतेन आजच्या संपादकीय मध्ये शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य आणि केंद्र सरकार हे निजामाचे बाप असल्याची टीका सेनेने केली होती. यावर तरुण भारतच्या आजच्या संपादकीय मध्ये भाजपचं सरकार निजाम असेल तर सेना सत्तेत कशी?, ज्यांनी दलित वस्त्यांवर हल्ले केले?, कसलेही आंदोलनं पुकारुन हफ्ते स्विकारले त्यांना रझाकार म्हणायचं का?, असा खोचक प्रश्न या लेखातून सेनेला विचारला आहे.
    ‘बावचळलेल्या शिवसेनेचा तोल सुटलाय’ अशा मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्तंभलेखक दिलीप धारुरकर यांच्या लेखात संजय राऊतांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे.
    निजामाच्या सरकारमध्ये अनंत गीते, रामदास कदम,  दिवाकर रावते सुभाष देसाई हे कोण आहेत? निझामाच्या सरकारमधील सलारजंग कि कासीम राझवी लोकसभेच्या निवडणुकीत एकतर्फी सेना भाजप युतीचा विजय झाला याला कारण मोदी लाट होती हे लक्षात न घेता सेनेनं आपला बेडूक फुगवला असल्यांचेही या संपादकीय लेखात मध्ये लिहले आहे.
===================================

'आनंद'च्या वाढदिवसानिमित्त मंगेशकर कुटुंबिय एकत्र !


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १२ : सुप्रसिद्ध गायक लता मंगेशकर यांनी आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांचा 11 जून रोजी वाढदिवस केला त्यावेळी त्यांच्या कुंटुबातील सर्वच सदस्य उपस्थित होते. आनंदचा हा आनंद त्यांनी आपल्या ट्विटरवर जाहीर केला. एकप्रकारे गेट टुगेदरचे फोटोच शेअर केले असे म्हणावे लागेल. आनंदच्या वाढदिवसाच्या निमित्तने घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं.
    आनंद भोसले यांनी कुटुंबासोबत वाढदिवसाचा केक कापला या खास सेलिब्रेशनसाठी लता दीदींनी आनंद यांच्या खास आवडीचा पदार्थ बनवला होता, असं दीदींनी स्वतः सांगितलं आहे. यावेळी आशा भोसले यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.
===================================

सरकारी बँकांचे थकीत कर्ज आणखी वाढले!


  • सोपान पांढरीपांडे,
    नागपूर- देशातील २६ सरकारी बँकांचे थकीत कर्ज १ जानेवारी ते ३१ मार्च २०१६ या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १,७९,९५९ कोटीने वाढले आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी या बँकांचे थकीत कर्ज ३,६१,७३१ कोटी होते ते ३१ मार्च २०१६ रोजी ५,४१,६९० कोटींवर गेले आहे.
    या बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे २०१५-१६ ताळेबंद सादर केला असून त्यांचे विश्लेषण ‘लोकमत’ने केले आहे. त्यातूनच ही गंभीर बाब समोर आली आहे. थकीत कर्जात २००८ ते डिसेंबर २०१५ या सात वर्षांत नऊपट वाढ होऊन हे कर्ज ३,६१,७३१ कोटी झाल्याचे वृत्त २५ मे रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती.
    या गंभीर स्थितीतून सावरण्यासाठी वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच सर्व सरकारी बँकांच्या अध्यक्षांची बैठक दिल्लीत घेतली. त्यानंतर जेटलींनी इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. दोन्ही बैठकांमध्ये थकीत कर्ज कमी करण्यावर बराच खल झाला. सरकारने बँकांना पुन्हा भांडवल द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर विचार करण्याचे आश्वासन जेटली यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
===================================
गरीबांवर उपचार न करणाऱ्या रुग्णालयांना दंड

नवी दिल्ली - दिल्ली सरकारने गरीबांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खाजगी रुग्णालयांना तब्बल 600 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दिल्लीतील फोर्टिस इस्कॉर्ट हर्ट इन्स्टिट्युट, मॅक्‍स स्पेशालिटी हॉस्पिटल (साकेत) या रूग्णालयांना गरिबांवर उपचार नाकारल्याने 600 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्लीत 1960 आणि 1990 मध्ये गरीबांवर विनामूल्य उपचार करण्याच्या अटीवर फोर्टिस इन्स्टिट्युट, शांती मुकुंद हॉस्पिटल, धरमशाळा कॅन्सर हॉस्पिटल आणि पुष्पवती सिंघानिया रिसर्च इन्स्टिट्युट यांना सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून देण्यात आली होती, अशी माहिती दिल्लीतील आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. हेम प्रकाश यांनी दिली. ते म्हणाले, ‘गरीबांवर उपचार का करण्यात आले नाहीत आणि त्याबद्दल दंड का आकारण्यात येऊ नये याबाबत स्पष्टीकरण मागविणारी नोटीस आम्ही डिसेंबर 2015 मध्ये या रुग्णालयांना पाठविली होती. मात्र कोणत्याही रुग्णालयाने समाधानकारक उत्तर दिले नाही.‘ त्यामुळे 2007 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे दंड आकारण्यात आल्याचेही प्रकाश यांनी सांगितले.

--------------------------------------------
चुकून भारतात आलेल्या पाकिस्तानी मुलांची सुटका

अमृतसर - पाकिस्तानची सीमा ओलांडून अनावधनाने भारताच्या सीमेत प्रवेश केलेल्या पाकिस्तानमधील तीन अल्पवयीन मुलांची भारताच्या सीमा सुरक्षा दलाने मिठाई देऊन पाकिस्तानमध्ये रवानगी केली आहे. सीमा सुरक्षा दलाने दाखविलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

शुक्रवारी आमीर (वय 15), नोमीन अली (वय 14) आणि अर्शद (वय 12) हे तीन अल्पवयीन मुले आपल्या दुचाकीवरून नातेवाईकांना भेटायला निघाली होती. मात्र ते भारताच्या सीमेत पोचले. आपण भारताच्या हद्दीत पोचल्याचेही त्यांना लक्षात आले नाही. दरम्यान हा प्रकार गस्तीवर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या निदर्शनास आला. त्यांनी या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीअंती ते अनावधनाने भारताच्या सीमेत आल्याचे समजले. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी ही बाब भारतीय अधिकाऱ्यांनाही कळवली. त्यानंतर या तीनही अल्पवयीन मुलांना सरळ पाकिस्तानच्या हद्दीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तानी लष्कराशी संपर्क साधून या तिघांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. रमजान सुरू असल्याने या तिघांना मिठाई देऊन पाठविण्यात आले. याबाबत घटनेबाबत बोलताना आमीर म्हणाला, "ज्या जवानांनी आम्हाला पकडले. त्यांनी आमची खूप काळजी घेतली. भारतीय लोकांनाही अशीच वागणूक देण्याची विनंती मी आमच्या (पाक) सरकारला करतो.‘
--------------------------------------------
"एनएसजी'संदर्भात राजकीय समन्वय हवा: चीन

बीजिंग - आण्विक इंधन पुरवठादार गटामध्ये (एनएसजी) भारताचा समावेश केला जाण्यासाठी अमेरिकेने आग्रही भूमिका घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनने आज (रविवार) या गटामध्ये नव्या देशांच्या समावेशासाठी चर्चेच्या माध्यमामधून आणखी राजकीय समन्वयाची बांधणी करण्याची गरज असल्याची भूमिका व्यक्त केली.

48 सदस्यीय एनएसजीमध्ये भारताच्या समावेशास विरोध करणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. चीनशिवाय ऑस्ट्रिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान आणि न्यूझीलंड या देशांनीही भारताच्या एनएसजीमधील प्रवेश विरोध दर्शविला आहे. अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार रोखणे हे एनएसजीचे मुख्य धेय आहे. भारताने अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचा मुख्य आक्षेप यासंदर्भात नोंदविण्यात आला आहे.

एनएसजीच्या सभासदत्वाचे मुख्य फायदे भारताला याआधीच मिळत असून अमेरिकेबरोबरील 2008 मधील आण्विक करारानंतर भारताला यासंदर्भात विशेष सूट देण्यात आली होती. 
--------------------------------------------
"जिहाद'साठी ब्रेनवॉश करणारी फिलिपिनो महिला

नवी दिल्ली - भारताची तपासयंत्रणा (एन.आय.ए.) सध्या  फिलिपिन्समधील एका महिलेच्या शोधात आहे. फिलिपिन्समधील या महिलेचे नाव केरन ऐशा हमिदोन असे असून भारतातील अनेक मुस्लिम तरुणांची माथी भडकावून त्यांना इसिसमध्ये भरती होण्यासाठी उद्युक्त केल्याचा तसेच त्यांना इसिसच्या कार्यक्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी मदत केल्याचा संशय तिच्यावर आहे. महंमद सिराजुद्दद्दीन आणि महंमद नासर या नुकत्याच पकडल्या गेलेल्या भारतीय तरुणांच्या संपर्कात  केरन होती. एनआयए सध्या तिच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. फिलिपिन्स सरकारकडून एनआयएने केरनबद्दल माहिती आणि तिच्याविरुद्ध असलेले पुरावे मागविले आहेत. फिलिपिन्समधील मनिला महानगराच्या जवळील ताग्विग भागातील दिएगो शिलॉँग गावातील तिचा पत्ता आणि तिचे दूरध्वनी क्रमांकही एनआयएनेने फिलिपिन्स सरकारला पुरविले आहेत.  
--------------------------------------------
"रमझान'मध्ये जेवल्याने हिंदु नागरिकास मारहाण
-

इस्लामाबाद - पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये रमझान या मुस्लीम धर्मीयांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महिन्यामध्ये सार्वजनिकरित्या अन्न सेवन केल्याबद्दल एका 80 पेक्षा जास्त वय असलेल्या हिंदु नागरिकास अत्यंत हिंस्त्र पद्धतीने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

येथील घोटकी जिल्ह्यामधील हयात पिताफी या दुर्गम गावामधील रहिवासी असलेल्या गोकल दास यांना येथील पोलिस हवालदार व त्याच्या भावाने प्रचंड मारहाण केली. दास हे सायंकाळी सहा वाजावयाच्या सुमारास येथील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमामधून देण्यात आलेल्या बिर्याणीचे सेवन करत होते. याच वेळी, अली हसन हैदरानी आणि त्याचा भाऊ मीर हसन यांनी या वृद्धास जमिनीवर फेकून देत अत्यंत निर्दयतेने मारहाण केली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधिकार बाचल काझी यांनी दिली आहे.
--------------------------------------------
बिहारमध्ये दोन माओवाद्यांना अटक

पाटणा - बिहारमधील बांका जिल्ह्यात आज (रविवार) पहाटे सुरक्षा रक्षकांनी दोन संशयित माओवाद्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांका जिल्ह्यातील पिलुआ-सुईया भागातून अटक करण्यात आलेल्या दोन माओवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि 100 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सिकंदर के. आणि अर्जुन के. अशी यांचे नावे आहेत. नक्षलविरोधी पथक राबवत असताना आज पहाटे तीन वाजता या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली असून, इन्सास रायफलही त्यांच्याकडे सापडली आहे. 
--------------------------------------------
प्रत्येक मारेकऱ्याला पकडूच पकडू - शेख हसीना

ढाका - गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेशात झालेल्या अल्पसंख्यांक व्यक्ती, निधर्मी विचारांचे उदारमतवादी लेखक आणि इस्लामेतर धर्मगुरूंच्या हत्या आणि प्राणघातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत पूर्ण देशभरात राबविण्यात आलेल्या झंझावाती कारवाईमध्ये ३७ दहशतवाद्यांसह तब्बल ३००० संशयितांची धरपकड करण्यात आली. अल्पसंख्यांक समुदायास लक्ष्य करणारया हल्लेखोरांना कडक शासन करण्याचा निर्धार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केला आहे.

सत्ताधारी आवामी लीग पक्षाच्या सभेत शेख हसीना ह्यांनी म्हटले होते की ,"बांगलादेशसारख्या छोट्या देशात गुन्हेगार कुठेही दडून बसले तरी त्यांना शोधणे तितकेसे अवघड नाही. आमचे पोलिस त्यांना हुडकून काढतील आणि हिंसाचाराचा खातमा करतील. प्रत्येक गुन्हेगारास, मारेकऱ्यास, त्यांना पैसा पुरविणाऱ्यास, आणि बोलवित्या धन्यास कायद्यानुसार शासन केले जाईल. पण यासंदर्भात नागरिकांनीही निव्वळ बघ्याची भूमिका घेउ नये. बहुतेक हल्ले दुचाकीस्वारांनी केलेले आहेत. अशा वेळी नागरिकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकार आणि पोलिस तुमच्या पाठीशी उभे राहील."
--------------------------------------------
एसटी महामंडळातर्फे शाळेत मिळणार पास
-

कोल्हापूर - नव्या शैक्षणिक वर्षासाठी एसटी महामंडळातर्फे शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पास देण्यात येणार आहेत. मध्यवर्ती बस स्थानक तसेच रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र केंद्रातर्फे ही सुविधा देण्यात येईल. यंदाच्या वर्षात कोल्हापूर शहरातील एसटी बस स्थानकावरून सुमारे 7 हजारांवर विद्यार्थ्यांना महामंडळातर्फे पास देण्याची सुविधा आहे.

विविध शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून बहुतांशी विद्यार्थी शहरात येतात. त्यांना रोज गावी ये-जा करण्यासाठी विद्यार्थी पास देण्याची सुविधा महामंडळाने केली आहे. राज्यभरात विद्यार्थी पास योजना सर्वाधिक प्रतिसाद लाभत आहे. 15 जूनपासून पास देण्याची योजना सुरू होणार आहे. ज्या शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी जास्त संख्येने एसटी बसने प्रवास करतात. अशा शाळांमध्ये एसटीच्या वाहतूक विभागाचे कर्मचारी पाठविण्यात येतील. एक -दोन दिवस शाळेत थांबून विद्यार्थ्यांना जागेवर पास देण्याची सुविधा करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज भरणे ओळखपत्र देणे यापासून ते पास वितरणाचे सर्वकाम एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस स्थानकावर येऊन रांगेत थांबण्याची फेरी वाचणार आहे. अर्थात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ज्या शाळेत जास्त आहे, अशा शाळांसाठी ही सुविधा प्राधान्याने देण्यात येणार आहे. 
--------------------------------------------
बाबरी,गोध्राच्या बदल्यासाठी तरुण अल कायदाकडे

नवी दिल्ली - अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होणारे भारतीय तरुण हे देशामधील बाबरी मशीद प्रकरण; तसेच 2002 मधील गोध्रा दंगलीमुळे प्रभावित झाले असल्याचे दिल्ली पोलिसांनी येथील न्यायालयात सांगितले. या तरुणांपैकी काही जण जिहाद करण्याच्या उद्देशार्थ पाकिस्तानमध्ये गेले आणि तेथे त्यांनी जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या हफीझ सईद, लष्कर-इ-तैयबाचा म्होरक्‍या झकी-उर-रहमान लख्वी आणि इतर काही दहशतवाद्यांची भेट घेतली, असे पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात 17 जणांवर आरोपपत्र दाखल करताना स्पष्ट केले आहे.

"विविध मशिदींमध्ये जिहादी भाषणे देताना त्याची (अटक करण्यात आलेला सईद अन्झर शाह) मोहमद उमर (हा आरोपी सध्या फरार आहे) याच्याशी भेट झाली. त्यांनी भारतामध्ये मुस्लिम समुदायावर होत असलेल्या अत्याचारांसंदर्भात; विशेषत: बाबरी व गोध्रासंदर्भात चर्चा केली. उमर हा शाह याच्या जिहादी विचारसरणीने प्रभावित झाला आणि त्याने स्वत:ला जिहादच्या कार्यासाठी झोकून देण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमध्ये येऊन यासंदर्भातील प्रशिक्षण घेण्याची इच्छाही त्याने दर्शविली,‘‘ असे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. 
--------------------------------------------

No comments: