Friday, 11 March 2016

नमस्कार लाईव्ह ११-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन; भारतातील नेतृत्वाने भडक विधानांविरुद्ध बोलावे 
२- लॉस एंजेलिस; नशेत तर्रर्र दोन महिलांची विमानातच जुंपली
३- ब्राझील; अद्भुत - प्राणदात्याला भेटण्यासाठी दरवर्षी 8000 किलोमीटर प्रवास करणारा पेंग्विन 
४- लंडन; मूल जन्माला येण्यापूर्वीच 'इसीस'चे प्रशिक्षण सुरु 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- इशरत जहाँ प्रकरणी गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली  
६- अखेर टी-20 विश्वचषकासाठी पाक संघ भारतात येणार 
७- भारत - पाक सामन्याबाबत उद्धव ठाकरे म्हणतात... 
८- मल्ल्या लबाड नसून सभ्यच- फारुख अब्दुल्ला 
९- श्रीश्री यांना दंडासाठी 3 आठवडे मुदत; कार्यक्रम सूरू 
१०- रा.स्व. संघाच्या गणवेशात चड्डीऐवजी पँट शक्य 
११- सक्तवसुली संचालनालयाकडून मल्ल्यांना समन्स  
१२- 'इंडिया'ऐवजी 'भारत' शब्दाचा आग्रह अमान्य  
१३- 'ललित मोदी, मल्ल्या ही मोदींची देशाला भेट'- कॉंग्रेस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१४- राज्यातील दोन लाख अनधिकृत बांधकामं नियमित 
१५- आंदोलन थांबवा, राज ठाकरेंच्या सूचना 
१६- 'आम्ही आग विझवणारे,' उद्धव यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला 
१७- डंपर आंदोलनाची धडधड विधानसभेत, राणेंचा स्थगन प्रस्ताव नाकारला 
१८- महिलांसाठी गोवा इतरांच्या तुलनेत सुरक्षित - फ्रान्सिस डिसोझा 
१९- हिंदूंवर टीका करण्याची फॅशन- नायडू  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- कोर्टाबाहेर बॉण्ड विक्री करणाऱ्याचा मुलगा सीए बनला 
२१- कोझिकोड; मजुरीच्या 50 रुपयांनी 'तो' बनला कोट्यधीश! 
२२- जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान लोकलच्या धडकेत ३ ठार 
२३- पनवेल; पाच गतीमंद मुलींवर बलात्कार प्रकऱणी करंजुलेला फाशी ऐवजी 10 वर्षे सक्तमजुरी 
२४- गुरगावमध्ये कॅब चालकाकडून महिलेवर बलात्कार 
२५- नांदेड जिल्‍हयातल्‍या डासमुक्‍तीचा उपक्रम उपयुक्‍त - युनिसेफचे युसूफ कबिर 
२६- मुखेड उपजिल्हा रुग्णालय नावापुरतेच; सुविधांचा अभाव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपण अशा ठिकाणी पोहचले पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केले पाहिजे
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

===========================================

अखेर टी-20 विश्वचषकासाठी पाक संघ भारतात येणार

अखेर टी-20 विश्वचषकासाठी पाक संघ भारतात येणार
कराची : शाहिद आफ्रिदीचा पाकिस्तान संघ ट्वेन्टी-20 विश्वचषकात खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार असल्याचं वृत्त जियो न्यूजने दिलं आहे. पाकिस्तान सरकारने संघाला भारतात जाण्यासाठी परवानगी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्यातल्या सुरक्षेची हमी दिली. त्यानंतर अतिशय वेगाने झालेल्या घडामोडी पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्यावर प्रशासकीय पातळीवर शिक्कामोर्तब झालं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान संघ आज रात्री किंवा उद्या सकाळी भारतात दाखल होईल.

टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा पहिला सामना 16 मार्चला कोलकातामध्ये होणार आहे. त्यानंतर 19 मार्चच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानची गाठ भारताशी पडणार असून हा सामनाही नव्या कार्यक्रमानुसार कोलकातामध्येच खेळवण्यात येणार आहे.
===========================================

राज्यातील दोन लाख अनधिकृत बांधकामं नियमित

राज्यातील दोन लाख अनधिकृत बांधकामं नियमित!
मुंबई : 31 डिसेंबर 2015 पर्यंतची राज्यातील 2 लाख बांधकामं सरकारनं नियमित केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे नवी मुंबईतील दिघा, ठाणे आणि पिंपरीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अनधिकृत बांधकामाच्या विळख्यातून महाराष्ट्राला सोडवण्यासाठी उच्च न्यायालयानेही हातोडा चालवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्य सरकारने त्या अनधिकृत बांधकामांना कायद्याचं सुरक्षाकवच देण्याची प्रक्रीया पूर्ण केली आहे. अनधिकृत बांधकामांसदर्भात समितीनं दिलेला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला आहे.

अनधिकृत बांधकाम कायदेशीर करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने

– समावेशक आरक्षणाच्या माध्यमातून सार्वजनिक सुविधा उपलब्ध करणे,

– जमीन मालकाच्या परवानगीनं सदर आरक्षण 200 मीटर परिघ क्षेत्रात स्थलांतरीत करणे,

– फेरबदलाची प्रक्रीया पूर्ण करुन अनावश्यक आरक्षणं वगळणे,

– संबंधित प्राधिकरणाच्या परवानगीनं बांधकाम क्षेत्राचा वापर बदलणे
===========================================

कोर्टाबाहेर बॉण्ड विक्री करणाऱ्याचा मुलगा सीए बनला

कोर्टाबाहेर बॉण्ड विक्री करणाऱ्याचा मुलगा सीए बनला!
बीड : शिक्षणाची आवड असली तर हालाखीच्या परिस्थितीवर मात करुन ध्येय साध्य करता येतं, याचं उत्तम उदाहरण बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये पाहायला मिळालं. कोर्टासमोर बसून बॉण्ड विक्री करणाऱ्या जेथलिया यांचा मुलगा चार्टर्ड अकाऊन्टंट अर्थात सीए झाला आहे.

दीनदयाळ जेथलिया हे माजलगावच्या न्यायालय परिसरात बॉण्ड विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यातूनच मिळाणाऱ्या पैशांतून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केलं. त्यामुळेच त्यांचा मुलगा सागर जेथलिया आता सीए झाला आहे. सीए म्हणजे काय असतं, हे माहित नसणाऱ्या दीनदयाळ यांना आपला मुलगा साहेब झाल्याचा आनंदच मोठा आहे.
===========================================

भारत - पाक सामन्याबाबत उद्धव ठाकरे म्हणतात...

भारत - पाक सामन्याबाबत उद्धव ठाकरे म्हणतात...
मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरमशालेत भारत – पाकिस्तान टी सामन्याला विरोध करणाऱ्या हिमाचल प्रदेशातील काँग्रेसप्रणित वीरभद्र सिंह सरकारचं समर्थन केलं आहे. तसंच हा सामना धरमशालेत खेळूच न दिल्याबद्दल उद्धव यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

“देशप्रेमाची भावना आता आणखी तीव्र होत आहे. शिवसेनेच्या भूमिकेशी आता अन्य पक्ष आणि मुख्यमंत्री सहमत होत आहेत. जोपर्यंत दहशतवादी कारवाया रोखत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध नकोत, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. त्याशिवाय पाकिस्तान सुधारणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मताच्या राजकारणात देशाचा घात होऊ नये, याची काळजी घ्या, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

हिमाचल सरकारने 19 मार्चच्या भारत-पाकिस्तान सामन्याला सुरक्षा पुरवण्यास विरोध केला होता. त्यातच सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्ताननेही धरमशाला इथं खेळण्यास नकार दिला. त्यामुळे आता हा सामना कोलकात्यातील इडन गार्डन मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
===========================================

आंदोलन थांबवा, राज ठाकरेंच्या सूचना

आंदोलन थांबवा, राज ठाकरेंच्या सूचना
यापुढील वाटचाल खडतर असली तरी ठाम आहे, चांगल्या-वाईट काळात साथ दिली यासाठी आभार मानतो : राज ठाकरे
मुंबई: दोन दिवसांपूर्वीच नव्या रिक्षा जाळा म्हणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. तशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत आंदोलन नको, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मनसे स्थापना दिनाच्या कार्यक्रमात परप्रांतियांच्या नवीन रिक्षा जाळा असं भडकाऊ भाषण केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली. या प्रकारानंत राज ठाकरेंनी आंदोलन मागे घेतलं आहे.
===========================================

'आम्ही आग विझवणारे,' उद्धव यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

'आम्ही आग विझवणारे,' उद्धव यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या प्रक्षोभक वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला हाणला आहे. अग्नीशमन दलाच्या प्रादेशिक समादेश केंद्राचा लोकार्पण सोहळा उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ‘मी अग्निशमन दलाच्या कार्यक्रमाला आलो आहे. हा आग विझवणाऱ्या लोकांचा कार्यक्रम आहे.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला हाणला.

दरम्यान, राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी रिक्षाच्या परवानाबद्दल चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आलं होतं. या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांच्यावर चौहोबाजूनी टीका सुरु आहे.
===========================================

डंपर आंदोलनाची धडधड विधानसभेत, राणेंचा स्थगन प्रस्ताव नाकारला

डंपर आंदोलनाची धडधड विधानसभेत, राणेंचा स्थगन प्रस्ताव नाकारला
मुंबई : विधानसभेत आज सिंधुदुर्गातल्या डंपर चालकांच्या आंदोलनाचे पडसाद उमटले. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी त्याला नकार दिला.

कार्यकर्त्यांवर लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन व्हावं, अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. महत्वाचं म्हणजे त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह शिवसेनेचे आमदारही वेलमध्ये आले. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनीही लाठीमार करणाऱ्या पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

नितेश राणे, प्रताप सरनाईक, मंगेश कुडाळकर, वैभव नाईक, संजय कुटे, अमित साटम असे सर्वपक्षीय आमदार वेलमध्ये ठाण मांडून बसले.

सिंधुदुर्गात गौणखणिज वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनानं वहातूकदारांवर अनेक अटी लादल्या आहेत. त्या अयोग्य असल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात हिंसक वळण लागलं होतं. त्याप्रकरणी आमदार नितेश राणे काही दिवस कोठडीत सुद्धा होते.

===========================================

मजुरीच्या 50 रुपयांनी 'तो' बनला कोट्यधीश!

मजुरीच्या 50 रुपयांनी 'तो' बनला कोट्यधीश!
कोझीकोड : पश्चिम बंगालमधील 22 वर्षीय मोफिजुल रहीमा शेख याचं नशीब केरळमध्ये पोहोचताच उघडलं. कामाच्या शोधात तो केरळच्या कोझीकोड शहरात दाखल झाल. दुसऱ्याच दिवशी त्याला एक कोटी रुपयांची लॉटरी लागली. आता तो त्याच्या घरी परतला आहे. 
मोफिजुल शेख बुधवारी कोझीकोडमध्ये पोहोचला. दुसऱ्या दिवशी त्याला मजुरीचे 50 रुपये मिळाले. त्या पैशांमधून त्याने लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. याच तिकीटाने त्याचं नशीब बदललं. 
आपल्याला लॉटरी लागल्याचं समजताच त्याने तातडीने पोलिस स्टेशन गाठलं आणि स्वत:साठी सुरक्षा मागितली. लॉटरीत जिंकलेली रक्कम कोणीतरी चोरेल, अशी भीती त्याला होती. 
लॉटरीचं तिकीट विकणाऱ्या एका अपंग व्यक्तीची मला दया आली आणि त्यामुळे मी तिकीट विकत घेतलं, असं मोफिजुलने सांगितलं.
===========================================

नशेत तर्रर्र दोन महिलांची विमानातच जुंपली

नशेत तर्रर्र दोन महिलांची विमानातच जुंपली!
लॉस एंजेलिस: क्षुल्लक कारणांवरून होणारी भांडणं बऱ्याचदा उपस्थितांचं मनोरंजन करणारी ठरतात. अशीच एक घटना घडलीये अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये. पण ती काही कोणत्या मॉलमध्ये, रस्त्यावर नाही तर थेट हजारो फूट उंचावर असणाऱ्या विमानात.

विमानात प्रवास करत असलेल्या आणि दारूच्या नशेत असलेल्या दोन महिला आपापल्या आवडीचं गाणं लावावं यावरून वादावादी करू लागल्या आणि पाहतापाहता विमानातील महिलावर्ग या भांडणात उतरला आणि मग केस ओढून महिलांची एकमेकींना मारहाण सुरू झाली.

हा सर्व प्रकार पाहता विमानातल्या इतर प्रवाशांनी फोनवर मारहाणीचं शुटींगही सुरू केलं. हा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे.

===========================================

जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान लोकलच्या धडकेत ३ ठार


  • मुंबई, दि. ११ - वाढत्या गर्दीमुळे, दरवाजाबाहेर लटकून स्टंट करताना, अशा अनेक घटनांमध्ये प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच शुक्रवारी संध्याकाळी पश्चिम रेल्वेवर लोकलची धडक बसून ३ जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी-गोरेगाव स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली.
    रेल्वे रूळ ओलांडणा-या ३ प्रवाशांना भरधाव वेगाने येणा-या लोकलची जोरदार धडक बसली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये १ पुरूष, १ महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे. 
===========================================

अद्भुत - प्राणदात्याला भेटण्यासाठी दरवर्षी 8000 किलोमीटर प्रवास करणारा पेंग्विन


  • रिओ दी जानेरियो, दि. 11 - ब्राझिलमधल्या 71 वर्षांच्या जोआव परेरा डिसोझा या वृद्ध मच्छिमाराला 2011 मध्ये दक्षिण अमेरिकेतून आलेला एक पेंग्विन किना-याजवळ आढळला. तेलानं माखलेला हा पेंग्विन मरणाच्या मार्गावर होता. जोआव यांनी त्याला तेलातून बाहेर काढलं, त्याची शुश्रुषा केली आणि त्याला खडखडीत बरं केलं. त्याला जोआवनं डिंडिम असं नावही दिलं. ब्राझिलमध्ये वन्यजीवांविषयी कडक कायदे आहेत आणि त्यांना तुम्हाला पाळता येत नाही. त्यामुळे बरा झालेल्या डिंडिमला सोडून देणं भाग होतं. पण डिंडिम काही जोआवला सोडायला तयार नव्हता. अखेर, काही कारणानं 11 महिन्यांनी डिंडिम पुन्हा त्याच्या मूळस्थानी म्हणजे जवळपास 8000 किलोमीटर दूर निघून गेला. आश्चर्य म्हणजे हा मूका प्राणी आपल्या प्राणदात्याचे उपकार लक्षात ठेवून दरवर्षी 8000 किलोमीटरचा पल्ला पार करतो आणि जोआवला भेटायला येतो.
    दुसऱ्या वर्षी जेव्हा डिंडिम आला त्यावेळी जोआवला आश्चर्यच वाटलं पण आता तो प्रघात झालाय कारण डिंडिम दरवर्षी येतो. मी माझ्या मुलाप्रमाणे डिंडिमला मानतो असं जोआव सांगतात. इंडिपेंडंटनं हे वृत्त दिलं असून ग्लोबो टिव्हीनं जोआवची मुलाखत घेतली आहे. डिंडिमला कुणी स्पर्षही करू शकत नाही. तसा कुणी प्रयत्न केला तर तो त्यांना चावतोच. पण माझ्या मात्र अंगाखांद्यावर खेळतो, माझ्याकडून भरवून घेतो आणि माझ्या लाडात येतो, जोआव सांगतात.
    जीवशास्त्राचे प्राध्यापक क्रेजवास्क सांगतात की, मी असं याआधी कधीही बघितलेलं नाही, कदाचित हा पेंग्विन जोआवला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतो, कदाचित तो जोआवला पेंग्विनच समजत असेल.
===========================================

पनवेलमध्ये पाच गतीमंद मुलींवर बलात्कार प्रकऱणी करंजुलेला फाशी ऐवजी 10 वर्षे सक्तमजुरी 


  • मुंबई, दि. 11 - पनवेलमध्ये अनाथाश्रमात पाच गतीमंद मुलींवर बलात्कार करणाऱ्या व एक खून करणाऱ्या रामचंद्र करंजुले याची फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सत्र न्यायालयाने करंजुले हा समाजासाठी कलंक असल्याचे म्हणत फाशी दिली होती तर अन्य पाच जणांना दोन ते 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.
    रामचंद्र करंजुले या अनाथाश्रमाचा संचालक असून सामूहिक बलात्कारामुळे क्षयरोगाने त्रस्त असलेल्या एका मुलीने प्राण गमावला होता. त्यामुळे त्याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. 
    समाजासाठी करंजुले हा त्रास असून त्याच्यासाठी जन्मठेप अपुरी असल्याचे खालच्या न्यायालयाने म्हटले होते. मात्र, उच्च न्यायालयाने खूनासाठी असलेले 302 हे कलम वगळून खुनाचा प्रयत्न 307 या कलामाखाली गुन्हेगार शिक्षेस पात्र असल्याचे ठरवत करंजुलेची फाशीची शिक्षा रद्द केली व त्यास 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. कळंबोलीतल्या कल्याणी महिला बालसेवा संस्थेमध्ये हा घृणास्पद प्रकार घडला होता. एक मुलगी गतीमंद होती तर दोन मुली मूक व बधीर होत्या. त्यांनी खाणाखुणा करून घडलेला प्रकार सांगितला व मुख्य आरोपीस ओळखले. या प्रकरणी सत्र न्यायालयाने खंडू कसबे, प्रकाश खडके, सोनोली बदाडे, पार्वती मावळे आणि नानाभाऊ करंजुले यांनाही गुन्हेगार घोषित करत दोन ते 10 वर्षांची शिक्षा दिली होती.
===========================================

इशरत जहाँ प्रकरणी गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली 


  • नवी दिल्ली, दि. ११ - इशरत जहाँ प्रकरणी गुजरात पोलिसांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. डेव्हिड हेडलीने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. वकील एम एल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. इशरत जहाँ प्रकरणी ज्यांच्यावर खटला सुरु आहे त्यांनी योग्य ठिकाणी दाद मागावी असं न्यायालयाने सांगितलं आहे. 
    मुंबई हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हीड हेडली याने मुंबई न्यायालयात दिलेल्या माहितीच्या आधारे ही मागणी करण्यात आली आहे. इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित हस्तक आणि सुसाईड बॉम्बर होती अशी माहिती डेव्हीड हेडलीने न्यायालयात दिली होती. सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या या याचिकेत पोलिसांना नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. 
===========================================

भारतातील नेतृत्वाने भडक विधानांविरुद्ध बोलावे

  • वॉशिंग्टन : भारतात केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक़ विधानांविरुद्ध भारतीय नेतृत्वाने स्पष्टपणे बोलायला हवे, असे मत धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ याच आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार होते. पण, त्यांना भारताने व्हिसा नाकारला. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.
    धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाच्या आयुक्त कॅटरिना लांटोस स्वेट याबाबत बोलताना म्हणाल्या की, लोकशाही व्यवस्था आणि १२५ कोटी लोकसंख्या असणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पण, या देशाने एक मोठी संधी गमावली आहे. अर्थात यातील काही बाबी माझ्या आकलनापलिकडील आहेत. भारताने २००१, २००९ नंतर पुन्हा एकदा या प्रकारे व्हिसा नाकारला आहे. लांटोस स्वेट म्हणाल्या की, काही भारतीय राज्यांत अतिशय कठीण कायदे आहेत.
===========================================
मल्ल्या लबाड नसून सभ्यच- फारुख अब्दुल्ला 

नवी दिल्ली- विविध बॅंकांकडून उचललेले 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्या हे लबाड नसून सभ्य आहेत, असे जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, ‘विजय मल्ल्या हे सभ्य गृहस्थ आहेत. सरकार जेंव्हा त्यांना बोलवेल तेंव्हा ते नक्की हजर होतील. खरे तर त्यांनी चांगली विमान सेवा सुरू केली होती. परंतु, त्यांना त्यामध्ये अपयश आहे. आज जरी ते अडचणीत आले असले तरी त्यामधून बाहेर पडतील. कारण ते लबाड नाहीत.‘ 

‘मल्ल्या यांना आता अपयश आले आहे. परंतु, जम्मू-काश्‍मीरला किती वेळा अपयश आले आहे. मग त्याला आपण काय म्हणाल?‘ असे अब्दुल्ला म्हणाले.
===========================================
श्रीश्री यांना दंडासाठी 3 आठवडे मुदत; कार्यक्रम सूरू
नवी दिल्ली- पर्यावरणाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त ठरलेला आर्ट ऑफ लिव्हिंगचा जागतिक संस्कृती महोत्सव अखेर सुरू झाला. पावसाने अचानक हजेरी लावल्याने कार्यक्रम पावसातच सुरू करावा लागला. हजारो लोक कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. 
तुरुंगात जाईन, पण दंड भरणार नाही असे म्हणणाऱ्या श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला अखेर दंड भरणे अनिवार्य असल्याचे ध्यानात आले असून, हा दंड भरण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे तीन आठवड्यांची मुदत मागितली आहे. 

रविशंकर यांनी यमुना नदीच्या काठावर पर्यावरणाला धक्का पोचवून परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने त्यांना पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
इतका पैसा लगेच उभा करणे शक्य नसल्याने आम्हाला मुदत देण्यात यावी अशी विनंती आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने करण्यात आली. ही विनंती राष्ट्रीय हरित लवादाने मान्य केली आहे.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग‘ आता किती रक्कम भरू शकते अशी विचारणा केली. त्यावर संस्थेने आम्ही २५ लाख रुपये भरू शकतो असे सांगितले. उर्वरित रक्कम भरण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्यावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने ही मागणी मान्य केली आहे. ही रक्कम दंड म्हणून नाही तर पर्यावरणाची भरपाई म्हणून घेत असल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट केले आहे.
===========================================
महिलांसाठी गोवा इतरांच्या तुलनेत सुरक्षित - फ्रान्सिस डिसोझा
पणजी- राज्यातील कायदे महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी उपयुक्त आहेत. स्थलांतरामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत काही समस्या निर्माण होतात. पण गोवा तुलनेने महिलांसाठी सुरक्षित जागा असल्याचे मत उपमुख्यमंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी व्यक्त केले. 

व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या क्रिमिनल लॉ क्‍लबच्या वतीने "हिलांची भूमिका आणि महिला सबलीकरण‘ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक प्रियंका कश्‍यप, महाविद्यालयाचे प्राचार्य एमआरके. प्रसाद, सामाजिक कार्यकर्त्या अल्बर्टिना अल्मेदा, प्राध्यापक सोनल सरदेसाई आदी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना ऍड. डिसोझा यांनी महिला सबलीकरणासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज व्यक्त केली. 
===========================================
रा.स्व. संघाच्या गणवेशात चड्डीऐवजी पँट शक्य
नवी दिल्ली- खाकी रंगाची अर्धी चड्डी आणि पांढरा सदरा असा गेली 91 वर्षे जुनी ओळख असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) गणवेश आता हद्दपार होण्याची शक्यता आहे. यावर ‘आरएसएस‘मध्ये विचार सुरू आहे. 

खाकीतील अर्धी चड्डी बंद करून त्याऐवजी पूर्ण पायजम्याचा गणवेश करण्यावर चर्चा सुरू आहे. अनेक दशकांपासून ‘आरएसएस‘चे प्रचारक घालत असलेला हा गणवेश म्हणजे शिस्तीचे प्रतीक मानले जाते. याचा अभिमानही ‘आरएसएस‘ प्रचारक बाळगतात. परंतु, बदलत्या काळानुसार ढगळी अर्धी चड्डी घालायला तरुण स्वयंसेवकांना लाज वाटते. 

‘आरएसएस‘मधील उच्चपदस्थांचे निर्णायक मंडळ- अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने नागपूर येथे तीनदिवसीय बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी गणवेशासंदर्भात चर्चा होणार आहे. नव्या गणवेशाची अंमलबजावणी करायची की जुनाच गणवेश काही काळ कायम ठेवायचा यावर चर्चेच्या फेऱ्या होतील. याबाबत चर्चा सुरू असल्याचे संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी सांगितले. 
नव्या पिढीचा कल लक्षात घेऊन खाकीवरून निळ्या किंवा करड्या रंगाचा गणवेश असावा अशा सूचना संघाकडे येत आहेत. 
===========================================
सक्तवसुली संचालनालयाकडून मल्ल्यांना समन्स 
नवी दिल्ली- विविध बॅंकांकडून उचललेले 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा आरोप असलेले विजय मल्ल्या यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज समन्स पाठविले असून, 18 मार्च रोजी हजर राहण्याचा आदेश देण्यात आले आहेत. 

विजय मल्ल्या यांनी आठवड्यापूर्वीच देश सोडल्याची माहिती सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. मल्ल्या यांचा विषय संसदेतही उपस्थित झाला आहे. सरकार व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. मल्ल्या यांनी घेतलेल्या कर्जाची सीबीआय चौकशी सुरू आहे. मल्ल्या यांनी यूपीए सरकारच्या काळामध्ये कर्ज घेतली आहेत. त्यांच्या खात्यावरील दिनांकावरून कोणी मदत केल्याचे समजते. दहा वर्षे कॉंग्रेस सरकार होते. परंतु, कर्जवसुलीसाठी कोणते पाऊल उचलले नाही, याला जबाबदार कोण? ‘मल्ल्या यांची भारतामधील जेवढी संपत्ती आहे ती जप्त करण्याची तयारी सुरू आहे. बॅंका त्यांच्याकडून एक-एक रुपया वसूल करतील. भारत सोडून गेले तेव्हा त्यांना थांबविण्याबाबत कोणता आदेश नव्हता,‘ असेही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. 

कर्ज थकवलेल्या आणि गेल्या चार वर्षांपासून बंद असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सला 950 कोटींचे कर्ज दिल्या प्रकरणी सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बॅंक अडचणीत आली आहे. बॅंकेच्या आजी माजी अधिकाऱ्यांना ‘ईडी‘ने नोटीस पाठवली असून, त्यांची चौकशी केली जाणार आहे.
===========================================
'इंडिया'ऐवजी 'भारत' शब्दाचा आग्रह अमान्य 
नवी दिल्ली - ‘इंडिया‘ ऐवजी "भारत‘ हाच शब्द वापरण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

 

भारताला ‘भारत‘ या नावानेच ओळखण्यात यावे तसेच त्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका निरंजन भटवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. शासकीय कामकाजातही ‘इंडिया‘ऐवजी "भारत‘ या शब्दाचाच वापर मागणीही करण्यात आली होती. याचिकाकर्ता जनहिताच्या नावाखाली अशा प्रकारचे भावनिक विषय न्यायालयात सादर करू शकत नसल्याचे म्हणत मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी ही याचिका फेटाळून लावली. ज्यांना भारत म्हणायचे आहे त्यांनी भारत म्हणावे, तर ज्यांना इंडिया म्हणायचे आहे त्यांनी इंडिया म्हणावे, असेही न्यायाधीशांनी सांगितले. मागील वर्षी एप्रिलमध्ये सत्र न्यायालयाने या याचिकेसंदर्भात केंद्रासह सर्व राज्य सरकारांकडून अभिप्राय मागवला होता.
===========================================
हिंदूंवर टीका करण्याची फॅशन- नायडू 
नवी दिल्ली - अलीकडच्या काळात हिंदू, भारतीय किंवा इंडियन असलेल्या कोणत्याही गोष्टीवर टीका करण्याची फॅशन आली असल्याची टीका केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी केली आहे. 

श्रीश्री रविशंकर यांच्या "आर्ट ऑफ लिव्हिंग‘ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हलच्या पार्श्‍वभूमीवर नायडू बोलत होते. ते म्हणाले, "देशात अलिकडे हिंदू, भारतीय किंवा इंडियन असलेल्या कोणत्याही गोष्टीवर टीका करण्याची फॅशन निघाली आहे. काही लोकांची मानसिकताच तशी झाली आहे. श्रीश्री रविशंकरजी यांच्याकडे नाव आणि प्रतिष्ठा आहे. ‘वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हल‘ हा देशासाठी प्रतिष्ठेचा आहे. जर त्यामध्ये पर्यावरणाचे काही विषय असतील तर त्यांची काळजी घेतली जाईल. या विषयाचे राजकारण करून कार्यक्रमावर बंदी आणणे देशासाठी चांगले नाही. हा विविधतेतील एकतेचा कार्यक्रम असून लष्कर हे श्रीश्री रविशंकर यांच्यासाठी नव्हे तर जगातील विविध भागातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी काम करत आहे.‘
===========================================
मूल जन्माला येण्यापूर्वीच 'इसीस'चे प्रशिक्षण सुरु 
लंडन - मूल जन्माला येण्यापूर्वीच त्याला दहशतवादी करण्याचे प्रयत्न ‘इसीस‘ ही दहशतवादी संघटना करत असून त्यासाठीचे प्रशिक्षणही देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

‘इसीस‘च्या ताब्यात असलेल्या प्रदेशामध्ये सध्या 31 हजार गर्भवती महिला आहेत. नव्या पिढीचे दहशतवादी निर्माण करण्यासाठी या महिलांचा उपयोग करण्यात येत आहे. "क्‍विलिअम‘ या ब्रिटनस्थित विचारवंतांच्या समूहाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात त्याबाबत माहिती दिली आहे. इसीसकडून अजाण बालकांचा दहशतवादी कारवायांसाठी उपयोग केला जातो. आत्मघातकी कारवाया करण्यासाठी त्यांना शाळा किंवा घरी देखील प्रशिक्षण दिले जाते. मात्र हे काम अधिक सोपे व्हावे यासाठी त्यांनी मुलाने जन्म घेण्यापूर्वीच ‘इसीस‘ ने त्याला प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. त्यातून इसीच्या भविष्यातील योजना अंमलात आणणारी पिढीच निर्माण करण्यात येत आहे.
===========================================
गुरगावमध्ये कॅब चालकाकडून महिलेवर बलात्कार 
गुरगाव- एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेवर कॅब चालकाने बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2014 मध्ये एका पस्तीस वर्षीय महिलेला कॅब चालक घरी सोडण्यासाठी निघाला होता. प्रवासादरम्यान त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला होता. बलात्कारावेळी त्याने मोबाईलमधून काही छायाचित्रे काढली होती व छायाचित्रणही केले होते. पीडित महिलेला सोशल नेटवर्किंगवर छायाचित्रे अपलोड करण्याची धमकी देऊन तो बलात्कार करत होता. महिलेच्या तक्रारीवरून हरीश चौहान नावाच्या कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

===========================================
'ललित मोदी, मल्ल्या ही मोदींची देशाला भेट'- कॉंग्रेस 
नवी दिल्ली - कधीही न परतणारे भारतीय (नॉन रिटर्निंग इंडियन) ललित मोदी आणि परतफेड न करणारे भारतीय (नॉन रिपेईंग इंडियन) विजय मल्ल्या म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेली भेट असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे. 

विजय मल्ल्या यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय भारताबाहेर जाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते रणदीप सूरजेवाला यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘29 जुलै 2015 रोजी विजय मल्ल्यांविरूद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तक्रार दाखल केली. त्यांनी सर्व प्रकारची चौकशी केली मात्र मल्ल्यांना अटक केले नाही. मल्ल्यांना ताब्यात घेण्यासाठी 12 ऑक्‍टोबर 2015 रोजी देशातील सर्व विमानतळांना नोटीस जारी केली. 23 नोव्हेंबर 2015 रोजी या नोटीसीला केवळ माहितीसाठी सूचना म्हणून बदलण्यात आले. या साऱ्या प्रकारामुळे खूप गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहेत. मल्ल्या देशातून बाहेर जाण्यामागे सरकारने मदत केली का? नोटीस का बदलण्यात आली? अर्थमंत्री आणि इतर सर्वजण स्वत:चे समर्थन का करत आहेत? मल्ल्यांना देशाबाहेर जाण्यासाठी कोणी मदत केली याचा खुलासा मोदी सरकारने करावा.‘
===========================================
नांदेड जिल्‍हयातल्‍या डासमुक्‍तीचा उपक्रम उपयुक्‍त - युनिसेफचे युसूफ कबिर 

नांदेड, 11- नांदेड जिल्‍हयात राबविण्‍यात येणा-या डासमुतीचा उपक्रम सर्वांसाठी उपयुक्‍त असून राज्‍यातील सर्व गावांमध्‍ये ही मोहिम राबवायला हवी, असे प्रतिपादन युनिसेफचे कार्यक्रम अधिकारी युसूफ कबिर यांनी केले.
      दिनांक 9 व 10 मार्च रोजी डासमुक्‍ती अभियानाच्‍या अभ्‍यासासाठी ते नांदेड जिल्‍हा दौ-यावर आले होते. हदगाव तालुक्‍यातील मरडगा, निवघा, माहूर तालुक्‍यातील लांजी, कंधार तालुक्‍यातील चिखलभोसी व नांदेड तालुक्‍यातील बोंढार नेरली या गावांची त्‍यांनी पाहणी केली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी अभिमन्‍यू काळे, युनिसेफचे समन्‍वयक जयंत देशपांडे, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांची यावेळी उपस्थिती होती.
      गावस्‍तरावर सांडपाण्‍याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी नांदेड जिल्‍हयाने शोषखड्डयाचा उपक्रम प्रभावशाली ठरला असून यातून गावामध्‍ये डासमुक्‍तीसह भूगर्भातील पाणी पातळी मोठया प्रमाणात वाढ झाल्‍याचे दिसून येत आहे. राज्‍यात आज मोठया प्रमाणावर पाणी टंचाईचे सावट असून त्‍यावर मात करण्‍यासाठी शोषखड्डयाचा उत्‍तम पर्याय ठरु शकतो. यासाठी राज्‍यातल्‍या सर्व गावांना शोषखड्डयाचा अभिनव उपक्रम राबविण्‍याचे आवाहन युनिसेफचे कार्यक्रम अधिकारी युसूफ कबिर यांनी केले. तसेच नांदेड जिल्‍हयातील राबविण्‍यात येणा-या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणीक गुणवत्‍ता वाढ अभियानांतर्गत डिजिटल शाळा उपक्रम व सदृढ बालकांसाठी छोटा भिम उपक्रमासंदर्भात नांदेड जिल्‍हयाचे कौतुक करुन त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. 
       दिनांक 10 मार्च रोजी जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाची जिल्‍हा परिषदेत त्‍यांनी बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी पाणी व स्‍वच्‍छता सहाय्य संस्‍था आणि युनिसेफ यांच्‍यावतीने काढण्‍यात आलेल्‍या समुदाय संचलित हागणदारीमुक्‍त गाव कृति आराखडा या संदर्भात तयार करण्‍यात आलेला माहितीपट अधिकारी व कर्मचा-यांना दाखविण्‍यात आला.  

===========================================
मुखेड उपजिल्हा रुग्णालय नावापुरतेच; सुविधांचा अभाव 

मुखेड उपजिल्हा रुग्णालय नावापुरतेच; सुविधांचा अभाव "
' डाँक्टरांची कमतरता तर कंत्राटी कर्मचारी जास्त '
मुखेड :- रियाझ शेख 
    एकीकडे शासन गरीब रुग्णांसाठी करोडोंचा खर्च करते, मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील अधिका-यांना मात्र याचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसते. भव्य प्रशस्त इमारतीत 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय फक्त नावालाच आहे का असा प्रश्न रुग्णांना पडत आहे. अनुभवी डाँक्टरांची कमतरता तर कंत्राटी व प्रतिनियुक्ती कर्मचा-यांची भरणा जास्त दिसुन येते. उन्हाळा असुन सुध्दा रुग्णांलयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. रुग्णालयात स्वच्छता मोठ्या प्रमाणात आढळुन येत नाही. रुग्णवाहिका असुन अडचन नसुन खोळंबा भंगार अवस्थेत रुग्णवाहिका दिसत आहे. यात रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळपणा दिसत आहे. तालुक्यात सत्तांतर होवुन दिड वर्ष उलटुन सुध्दा रुग्णकल्याण समितीची स्थापन करण्यात आली नाही. उपजिल्हा रुग्णालयातील चालु घडामोडी व रुग्णांना होत असलेल्या असुविधेकडे लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधीपक्ष, स्वघोषित सामाजिक नेते, कार्यकर्ते यांचा दुर्लक्ष दिसत आहे. 
       मुखेड उपजिल्हा रुग्णालय शहरात असुन दररोज जवळपास तीस पेक्षा अधिक गावातील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. यारुग्णालयातील महत्वाची पदे अनेक दिवसांपासुन रिक्त असल्यामुळे साहजिक याचा रुग्ण सेवेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्ष पाहणी करत असताना रुग्णालयात स्वच्छता दिसुन आली नाही. अनेक वार्डाच्या परिसरात दुर्गंधी येत होती. पहिल्या पेक्षा नवीन आलेले वैद्यकिय अधीक्षक चांगले शिस्तीचे असल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यांचा प्रत्यक्ष जम बसले नसल्याची जाणीव झाली. येथील बरेच कर्मचारी कंत्राटी तत्वावर आहेत. नियमीत सेवा देणा-या डाँक्टरांची कमतरता भासत आहे. दररोज जवळपास दोनशे ओपीडीची नोंद होते. एकीकडे शासन करोडों खर्च करते, मुखेड रुग्णालयातील अधिका-यांना याचे गांभीर्य दिसत नाही. उपजिल्हा रुग्णालयाच्या असुविधेकडे सर्वच राजकीय, सामजिक नेते कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनतेतुन होत आहे.
===========================================
===========================================
===========================================
===========================================
===========================================
===========================================

No comments: