Monday, 29 February 2016

नमस्कार लाईव्ह २९-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- टॅक्स रेट, काय स्वस्त, काय महाग आणि संपूर्ण अर्थसंकल्प 
२- बजेटमधून नोकरदारांना काय मिळालं?
३- बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळालं?
४- बजेटमधून तरुणांना काय फायदा झाला? 
५- १७ वर्षात पहिल्यांदाच बजेटमध्ये डिफेन्सचा अनुल्लेख 
६- या अर्थसंकल्पात नवे काहीही नाही: कॉंग्रेस  
७- गरिबांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- नरेंद्र मोदी 
८- हा अर्थसंकल्प प्रागतिक व दूरदृष्टी असलेला - भाजप
९- महिला सशक्तीकरणासाठी ट्विटरचा पुढाकार, #PositionOfStrength अभियान सुरु 
१०- चिटफंड कंपन्यांना चाप, नवा कायदा आणणार 
११- राहुल यांच्या विनंतीमुळे ब्रेल पेपर करमुक्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- विलेपार्ले; फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला बेदम मारहाण 
१३- मालेगाव; कवटी फुटूनही विजयने केला अतिरेक्‍यांचा खात्मा 
१४- मी मोदींपेक्षा अधिक मोठा देशभक्त: केजरीवाल 
१५- डिझेल १ रुपये ४७ पैशांनी महागले, तर पेट्रोल ३ रुपये २ पैशांनी स्वस्त.
१६- उपोषणादरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या समाजसेविका ईरोम शर्मिला यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- नाशिक;  मनसेला भगदाड, माजी महापौर शिवसेनेत दाखल
१८- सोलापूर; भाकर देऊन जपूया माणसाची संवेदनशीलता 
१९- पुण्यात अवकाळी पाऊस  
२०- औरंगाबादच्या गणेश दुसारीयाने पटकाविला मराठवाडा श्री किताब 
२१- नांदेड डासमुक्‍तीचा पॅटर्न कोल्‍हापूर जिल्‍हयात राबविण्‍यात येणार 
२२- भ्रष्टाचार प्रकरणी माजी केंद्रीयमंत्री पी. के. थुंगुन यांना दिल्ली कोर्टाने साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
माणसाची सर्व कामे या सातपैकी कुठल्याही एका कारणांमुळे होतात, संधी, आरोग्य, नाईलाज, सवय, कारण, वासना, इच्छा
(राज तिडके, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.


====================================

विलेपार्ले; फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला बेदम मारहाण


CCTV : फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला बेदम मारहाण
विलेपार्ले शिवसैनिकांची चांगली कामं माध्यमांना दिसत नाहीत, असे एकीकडे उद्धव ठाकरे म्हणत असतानाच विलेपार्ल्यातील युवासेना पदाधिकाऱ्याने एका दुकानदाराला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 100 फुकट वडापावांसाठी या पदाधिकाऱ्याने दुकानादाराला बांबूने मारहण केली.
मुंबईच्या विलेपार्ले पश्चिम इथल्या तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजर चेतन पटेल यांना युवासेना पदाधिकाऱ्याने मारहाण केली. सुनील महाडीक असे या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. गेल्या शनिवारी 26 फेब्रुवारीला हा प्रकार घडला. 
विलेपार्ले पश्चिमच्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ‘साहेब क्रिकेट चषक’ आयोजित करण्यात आलं होतं. या सामन्यांसाठी तृप्ती फरसाण मार्टच्या मालकानं 100 वडापाव फुकट दिले नाहीत, म्हणून युवासेना पदाधिकाऱ्याने दुकानाच्या मॅनेजरला बेदम मारहाण केली.
 तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजरला कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून सुनील महाडीकवर जुहू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करून गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 एकीकडे शिवसैनिकांची चांगली कामं माध्यमांना दिसत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंकडून होत असतांना शिवसैनिकांच्या दादागिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.
====================================

नाशकात मनसेला भगदाड, माजी महापौर शिवसेनेत दाखल

नाशकात मनसेला भगदाड,  माजी महापौर शिवसेनेत दाखल
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला बालेकिल्ल्यातच भगदाड पडलं आहे. कारण मनसेचे पहिला महापौर यतिन वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिक महापालिकेत सत्ता आली, त्यावेळी मनसेकडून महापौरपदाची माळ यतिन वाघ यांच्या गळ्यात घालण्यात आली. पण आता त्यांनीच मनसेला राम राम ठोकला आहे. 
यतिन वाघ यांच्यासह माजी स्थायी समिती अध्यक्ष आर.डी. धोंगडे आणि अरविंद शेळके यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. या तिघांनीही मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. 
ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीची नांदी असून आगामी महापालीका निवडणुकीत भाजपा विरुध्द शिवसेना अशीच मुख्य लढत असेल हेही या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया नाशिकमधल्या जेष्ठ पत्रकारांनी दिली आहे.
====================================

टॅक्स रेट, काय स्वस्त, काय महाग आणि संपूर्ण अर्थसंकल्प



काय काय महागणार?

महाग  – कार, सोने, तंबाखू, सिगरेट, गुटखा, हिरे, ब्रँडेड कपडे, विमा पॉलिसी, ब्युटी पार्लर, सिनेमा, केबल, मोबाईल बिल, प्रवास, हॉटेल, कोळसा आणि सर्व करपात्र सेवा

 काय स्वस्त?

कुकींग स्टोव्ह, गोबर गॅस
सॅनिटरी पॅड्स
इंटरनेट मॉडेम्स –
सेट टॉप बॉक्स –
सीसीटीव्ही कॅमेरे
न्यूज प्रिंट – स्वस्त
सोलर दिवे – स्वस्त
बजेटमधून महिलांना काय मिळालं?
देशातील 50 टक्के महिलांनाही आपल्या बजेटमध्ये जेटलींनी महत्वाचं स्थान दिल्याचं दिसतंय.
विशेषत: देशभरात चुलीवर स्वयंपाक केल्यानं धुरात राहून कायम महिलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो, त्यावर उपाय म्हणून देशभरातील घराघरात एलपीजी सिलेंडर पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 2 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
त्याशिवाय गोरगरीब कुटुंबासाठी 1 लाखाचा विमा आणि ज्येष्ठांसाठी अधिकच्या 30 हजाराची तरतूद सरकारनं केलीय.
बजेटमधून तरुणांना काय?

  • स्टॅन्ड अप इंडियासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद
  • तीन वर्षात 1 कोटी तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण
  • नव्या उद्योजकांच्या कर्मचाऱ्यांचा 3 वर्षांचा पीएफ सरकार भरणार
  • 100 मॉडेल करिअर सेंटरद्वारे 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगार
  • प्रधानमंत्री कौशल्य विकास 1500 सेंटरमधून राबवणार
  • कौशल्य विकास योजनेसाठी 1700 कोटी रुपयांची मदत
  • किमान 300 दिवस कामाचा नियम 240 दिवसांवर
  • मागासवर्गीयांना उद्योग स्थापन करण्यासाठी योगदान
  • कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भर

    यंदाच्या अर्थव्यवस्थेत मोदी सरकारने स्वत:वरील ‘शेतकरीविरोधी सरकार’ हा डाग अटोकाट पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी यंदा भरघोस तरतूद केल्याचं पाहायलं मिळालं आहे.

    • 5 वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न
    • 3 वर्षांत 5 लाख एकर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली
    • नाबार्डकडून सिंचनासाठी 20 हजार कोटी राखीव निधी
    • भूजलपातळी वाढवण्यासाठी 60 हजार कोटी रुपये
    • बी-बियाणे तपासणीसाठी देशभरात 2 हजार प्रयोगशाळा
    • डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी 5 हजार कोटी रुपये
    • हमीभावासाठी ऑनलाईन पद्धतीने मालविक्री
    • पशुधन संजीवन योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 4 योजना
    • 38 हजार 500 कोटी रुपयाचा निधी मनरेगावर खर्च करणार
    • 1 मे 2018 पर्यंत प्रत्येक खेड्यात वीज पुरवठ्याचं उद्दिष्ट
    • खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
====================================

बजेटमधून नोकरदारांना काय मिळालं

बजेटमधून नोकरदारांना काय मिळालं?
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17 सालासाठी अर्थसंकल्प मांडला. या बजेटकडे नोकरदार वर्गाचं फार मोठ्या प्रमाणात आशा होत्या. मात्र, अरुण जेटली यांनी नोकरदारांच्या फारशा अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत.
यंदाही टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, छोट्या करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करामध्ये 3 हजारापर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे लहान करदात्यांना खूश करण्याचा मोदी सरकारनं प्रयत्न केला आहे. 
लहान करदात्यांना जरी खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी श्रीमंतांना करकपात अजिबात करण्यात आलेली नाही. 1 कोटी उत्पन्न असणाऱ्यांना 12 ते 15 टक्के सरचार्ज आकारण्यात आला आहे. दुसरीकडे घरभाडे कर सवलतीची मर्यादा 24 हजारावरुन 60 हजारावर करण्यात आली आहे. तर घरासाठी कर्ज घेण्याऱ्या कर्जदारांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 50 लाखांपर्यंत घरासाठी 35 लाख कर्ज घेतल्यास त्यामध्ये 50 हजार व्याज वजावट करण्यात येणार आहे.
====================================

महिला सशक्तीकरणासाठी ट्विटरचा पुढाकार, #PositionOfStrength अभियान सुरु

महिला सशक्तीकरणासाठी ट्विटरचा पुढाकार, #PositionOfStrength अभियान सुरु
नवी दिल्ली : ऑनलाईन जग असो वा ऑफलाईन… दोन्ही ठिकाणी पुरुषसत्ताक संस्कृती घट्ट रुजली असल्याचं एका अभ्यासावरुन लक्षात आल्यावर ट्विटरने एक अनोखं अभियान सुरु केलं आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी ट्विटरने #PositionOfStrength अभियान सुरु केलं आहे. 
ऑस्ट्रेलिया आणि आयरलँडमध्ये या अभियानाला यापूर्वीच सुरुवात झाली आहे. आता हे अभियान भारतातही दाखल झालं आहे. ऑनलाईन व्यासपीठावरील लैंगिक भेदभाव कमी करण्याचं ध्येय या अभियानाने डोळ्यासमोर ठेवलं आहे. शिवाय, महिला नेत्यांच्या दुसऱ्या पिढीला प्रभावशाली बनवण्यासाठी प्रेरणा देण्याचा उद्देश या अभियानासमोर आहे.
====================================

बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळालं

बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळालं?
नवी दिल्ली : यंदा देशाचा अर्थसंकल्प हा शेती आणि ग्रामिण भागासाठी महत्त्वाचा होता…सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला नऊ सुत्री अर्थसंकल्प सादर केला..ज्या शेती आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला…या अर्थसंकल्पात शेतीला काय मिळालं पाहुयात…
देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न येत्या 5 वर्षात दुपटीनं वाढवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय..सोबत जलसंधारण, मृदसंधारणावर यंदा विशेष भर देण्यात आलाय… 
देशातील जास्तित जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी सध्या सुरु असलेल्या 89 प्रकल्पांपैकी 23 प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहेत..सोबत देशात वर्षभरात 5 लाख शेततळे उभे करण्यात येतील..
पंतप्रधान सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत देशभरातील 2 हजार खत दुकानात माती परिक्षणाची सोय करण्यात येणार आहे… खत कंपन्यांना शहरातील जैव कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे…
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना
आणि सेंद्रीय शेतमालाच्या विक्रीसाठी ऑर्गेनिक व्हॅल्यू चैन डेव्हलपमेंट योजना लागू केली जाणार आहे…
या अर्थसंकल्पात कडधान्याचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आलाय…यासाठी देशभरातील 622 जिल्ह्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलंय..
शेतीतील प्रक्रीया उद्योगाचं महत्त्व ओळखून देशभरात फूड प्रोसेसिंग उद्योगाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे…या क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणूकीला परवानगी देण्यात आलीय…
====================================

चिटफंड कंपन्यांना चाप, नवा कायदा आणणार

चिटफंड कंपन्यांना चाप, नवा कायदा आणणार
नवी दिल्ली: देशभरात अनेक कंपन्यांनी सामान्यांना दुप्पट तिप्पट पैसे देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची वसुली केली. त्यामुळे देशभरात करोडो रुपयांचा चिटफंड घोटाळा झाला आहे. 
अनेक कंपन्यांनी चिटफंडच्या माध्यमातून सामान्यांना गंडा घातला आहे. मात्र यापुढे अशा घोटाळेबाजांवर कडक करावाई करण्यासाठी सरकारनं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. कारण चिटफंड घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी नवा कायदा आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. 
त्यामुळे शारदा चिटफंट, पर्ल्स, समृध्द जीवन यासारख्या कंपन्यांवर कारवाई करता येण्याचे संकेत आहेत. छोट्या गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्यांना यामुळे चाप बसेल, अशी अपेक्षा आहे.
====================================

बजेटमधून तरुणांना काय फायदा झाला?

बजेटमधून तरुणांना काय फायदा झाला?
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटलींनी केंद्रीय बजेट आज लोकसभेत सादर केलं. देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा भाग मानल्या जाणाऱ्या तरुणांसाठी जेटलींनी काय दिलं, याचा लेखाजोखा

  • स्टॅन्ड अप इंडियासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद
  • तीन वर्षात 1 कोटी तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण
  • नव्या उद्योजकांच्या कर्मचाऱ्यांचा 3 वर्षांचा पीएफ सरकार भरणार
  • 100 मॉडेल करिअर सेंटरद्वारे 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगार
  • प्रधानमंत्री कौशल्य विकास 1500 सेंटरमधून राबवणार
  • कौशल्य विकास योजनेसाठी 1700 कोटी रुपयांची मदत
  • किमान 300 दिवस कामाचा नियम 240 दिवसांवर
  • मागासवर्गीयांना उद्योग स्थापन करण्यासाठी योगदान
 ====================================

१७ वर्षात पहिल्यांदाच बजेटमध्ये डिफेन्सचा अनुल्लेख


  • नवी दिल्ली, दि. २९ - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना संरक्षण क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांच्या तरतुदींची माहिती दिली. अर्थसंकल्पात देशाच्या लष्करी खर्चाची माहिती देणे टाळल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 
    अर्थसंकल्पात देशाच्या संरक्षण खर्चासाठी केल्या जाणा-या तरतुदीची माहिती दिली जाते. १७ वर्षात पहिल्यांदाच अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीची माहिती देण्यात आलेली नाही असे संरक्षण तज्ञ निवृत्त ब्रिगेडीयर गुरमीत कानवाल यांनी सांगितले. 
    मागच्या वर्षीपेक्षा २०१६-१७ मध्ये लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी कमी निधीची तरतुद केल्याची शक्यता आहे कारण संरक्षण क्षेत्रातील निवृत्ती वेतनावर जास्त खर्च होणार आहे. २०१५-१६ मध्ये जेटली यांनी संरक्षण क्षेत्रासाठी २,४६,७२७ कोटींची तरतूद केली होती. २०१४-१५ पेक्षा ७.७ टक्क्यांनी संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्यात आली होती. 
    चीनची वाढती लष्करी ताकत लक्षात घेता भारताने संरक्षणावर जीडीपीच्या तीन टक्के खर्च केला पाहिजे असे तज्ञ सांगतात. २०१५-१६ मध्ये एकूण सरकारी खर्चाच्या १३.८८ टक्के लष्करी खर्चासाठी तरतूद करण्यात आली होती. 
    पायाभूत सुविधांचा फायदा 
    आकडेवारीचा उल्लेख केला नसला, तरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेल्या भरीव तरतुदींचा फायदा संरक्षण क्षेत्राला होईल, असे दिसते. गेल्या दोन वर्षांमध्ये रस्त्यांची बांधणी आणि लोहमार्ग वृद्धी वेगाने होत असल्याचे, अर्थमंत्र्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वहनमंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे नाव घेऊन सांगितले. सीमावर्ती राज्ये त्याचप्रमाणे, इशान्य भारतामध्ये या वेगाने बांधल्या जाणा-या रस्त्यांचा फायदा भारतीय सैन्याला नक्कीच होणार आहे. विशेषत: चीन रस्त्यांच्या माध्यमांतून त्यांच्या सीमावर्ती भागामध्ये व्यवस्थित पोहोचला असताना, भारताला असे प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच या पायाभूत सुविधा अप्रत्यक्षरीत्या संरक्षण क्षेत्राला फायदेशीर ठरतील.
====================================
 या अर्थसंकल्पात नवे काहीही नाही: कॉंग्रेस 
केंद्र सरकारतर्फे आज (सोमवार) मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून कृषी क्षेत्र व रोजगार निर्मितीच्या आव्हानांसंदर्भात त्वरित उपाय दिसत नसल्याची टीका कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. 
"हा भविष्याभिमुख अर्थसंकल्प आहे. मात्र दुदैवाने वर्तमानात ज्या उपायांची आवश्‍यकता होती; त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सध्या रोजगार निर्मिती व कृषी क्षेत्रामधील आव्हाने सर्वांत गंभीर आहेत. मात्र याविषयी अर्थसंकल्पात काहीही नाही,‘‘ असे कॉंग्रेस नेते कमल नाथ यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही सरकारतर्फे मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये नवे काहीही नसल्याची टीका केली आहे.
====================================
गरिबांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- नरेंद्र मोदी
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरिबांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पात घरांवर भर देण्यात आल्यामुळे प्रत्येकाचे घराचे स्वप्न साकार होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जेटली यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, ‘अर्थसंकल्पाचा मुख्य ध्येय म्हणजे गाव, गरीब, महिला व युवावर्ग आहे. गरिबांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. देशातील युवकांना रोजगार मिळवूण देण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. देशातील युवकांची शक्ती चांगल्या दिशेने वळविण्याचा हा एक प्रयत्न आहेत.‘ ‘देशात गरिबीच्या नावावर राजकारण केले जात आहे. एखादी महिला चुलीवर स्वयंपाक करते तेव्हा तिच्या शरिरामध्ये 400 सिगारेट एवढा धूर जात आहे. यामुळे आमचे सरकार दीड कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देणार आहे. शिवाय, अर्थसंकल्पामध्ये आरोग्य सेवेवर जास्त भर देण्यात आला आहे. देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प असून ते नक्कीच होईल, असे मोदी म्हणाले.
====================================
पुण्यात अवकाळी पाऊस 
पुणे : शहराच्या विविध भागांत अवकाळी पावसाने आज (सोमवार) हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला आहे. गेल्या दोन दिवसांत मराठवाडा, नाशिक, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाबरोबरच गारपीटही झाली आहे. 
पुणे शहराच्या विविध भागांमध्ये आज दुपारी 4.30 च्या सुमारास पाऊस पडला. सिंहगड रस्ता परिसर, बिबवेवाडी भागात पावसाचा जोर जास्त होता. कोथरुडसह मध्यवर्ती पुण्यातही पाऊस पडला. बाजीराव रस्त्यावर अनेक गाड्या घसरल्याचेही चित्र दिसून आले. 
पावसाला पोषक वातावरणामुळे राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यात उद्याही (मंगळवार), तर मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
====================================
राहुल यांच्या विनंतीमुळे ब्रेल पेपर करमुक्त
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) संसदेमध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या "ब्रेल पेपर‘वरील आयात कर माफ करण्याची घोषणा केली. ब्रेल पेपरवरील कर माफ करण्याची विनंती कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यातर्फे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला करण्यात आली होती. सरकारने ही विनंती मान्य करत हा कर माफ केला आहे. 
बंगळुरमधील माऊंट कार्मेल महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या चंदना चंद्रशेखरने यासंदर्भात गांधी यांना पत्र लिहिले होते. चंदना ही अंध आहे. या पत्रामध्ये ब्रेल पेपरवरील आयात करामुळे अंध विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट करत, चंदनाने हा कर रद्द करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याची विनंती केली होती. या पत्राची योग्य दखल घेत राहुल यांच्याकडून वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठविण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर, राहुल यांच्याकडून करण्यात आलेल्या विनंतीचा मान ठेवत सरकारकडूनही ब्रेल पेपरवरील कर रद्द करण्यात आला आहे. 
====================================
सोलापूर; भाकर देऊन जपूया माणसाची संवेदनशीलता


सोलापूर : धकाधकीच्या जीवनात माणसातील संवेदनशीलता हरवून गेली आहे. उपाशी माणसाला एखादी भाकर देऊन आपली संवदेशनशीलता जपता येईल का, याच विचाराने पुण्यातील तरुणांनी एकत्र येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या "रोटी डे‘ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या 1 मार्च रोजी ‘रोटी डे‘ साजरा होणार असून, हजारो नेटीझन यात सहभागी होणार आहेत. 
फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून ऑनलाइन असणाऱ्या आजच्या तरुणांमध्येही संवेदनशीलता आहे हे ‘रोटी डे‘च्या निमित्ताने दिसून येत आहे. आपल्या सगळ्यांमध्ये असलेल्या संवेदनशील कोपऱ्यात एक खूप चांगला माणूस दडला आहे. आपल्यातल्या चांगल्या माणसाची ओळख जर प्रत्येकाला झाली, तर कोणीच भुकेला राहणार नाही, असे "रोटी डे‘साठी पुढाकार घेतलेल्या अभिनेता अमित कल्याणकर यांचे म्हणणे आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकातील संवेदनशील माणूस जगा होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
1 मार्च रोजी ‘रोटी डे‘च्या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या परिसरातील गोरगरिबांना, भटक्‍यांना भाजी-भाकरी व इतर खाद्यपदार्थ द्या. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा. त्यांच्यासोबत सेल्फी काढून आपला अनुभव आणि क्षणचित्रे फेसबुक, व्हॉट्‌सऍप आणि इतर सोशल मीडियावर #rotiday हा हॅशटॅग वापरून शेअर करा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
====================================
 हा अर्थसंकल्प प्रागतिक व दूरदृष्टी असलेला - भाजप

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) संसदेमध्ये मांडलेला राष्ट्रीय अर्थसंकल्प हा प्रागतिक व दूरदृष्टी असलेला असल्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने (भाजप) व्यक्त केली. शेतकरी व समाजामधील दुर्बल घटकांना प्राधान्य दिलेल्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून तरुणांच्या सक्षमीकरणासही हातभार लागणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. 
"हा अर्थसंकल्प सर्वांकरिता आहे. बंदरे, रेल्वे, विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, आरोग्य क्षेत्रामध्ये गोरगरीबांच्या उपचारार्थ येणाऱ्या खर्चापैकी एक लाख रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. हा एक प्रागतिक व दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प आहे,‘‘ असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले. 
जावडेकर यांच्यासह मुख्तार अब्बास नक्वी, जे पी नड्डा या केंद्रीय मंत्र्यांनीही या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीही या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे.
====================================
कवटी फुटूनही विजयने केला अतिरेक्‍यांचा खात्मा

द्यानेच्या वीरपुत्राच्या बलिदानातून युवकांना प्रेरणा, मात्र कुटुंबासाठी अनेक स्वप्ने राहिली अधुरी

मालेगाव - बांधकामावरील दगड-विटा डोक्‍यावर घेऊन विजयला वाढविले. प्रतिकूल परिस्थितीत संकटांचा सामना करत जिद्दीने तो सैन्यात भरती झाला. त्याच्या रूपात सुखाचे दिवस दिसू लागले होते, पण नियतीला ते मान्य नव्हते. भारतमातेचे रक्षण करताना तो शहीद झाला. अतिरेक्‍यांशी लढताना त्याने चाळीस जवानांचे प्राण वाचविले. विजय शहीद झाला असला, तरी नावाप्रमाणेच त्याच्या कर्तबगारीने अनेकांच्या मनावर त्याने ‘विजय’ मिळविला. शहीद विजयची आई असल्याचा मला अभिमान आहे, अशा भावना वीरमाता इंदूबाई पवार यांनी व्यक्त केल्या.
मालेगावच्या वेशीवर असलेले द्याने हे छोटंसं गाव. हद्दवाढीनंतर त्याचा शहरात समावेश झाला. येथील गंगाधर पवार पत्नी, मुलगी व तीन मुलांसह राहतात. पती-पत्नीने बांधकामावर मजुरी करून मुलांच्या शिक्षणावर भर दिला. मोठा विजय बी.ए. झाला. मात्र, नोकरी न मिळाल्याने ते सैन्यभरतीला गेले. नागपूर येथे १९९३ ला ‘सीआरपीएफ’मध्ये ते भरती झाले. सुरवातीपासूनच त्यांची सेवा जम्मू-काश्‍मीरमध्ये विविध भागांत होती. डिसेंबर २००० मध्ये त्यांचा ज्योती यांच्याशी विवाह झाला. 
दोडा (जम्मू-काश्‍मीर) कॅम्पमध्ये विजय २००१ मध्ये कार्यरत होते. सहा सप्टेंबर २००१ ला कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते तैनात होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास अतिरेक्‍यांचा ट्रक प्रवेशद्वारात घुसला. ट्रकमध्ये स्फोटके लावलेल्या विटा होत्या. ट्रकच्या मागे एका वाहनात सशस्त्र अतिरेकी होते. अतिरेक्‍यांची वाहने प्रवेशद्वारातून घुसताच विजय यांच्यासह सहकाऱ्यांनी रोखले. अतिरेक्‍यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्यास जवानांनी प्रत्युत्तर दिले. अतिरेक्‍यांना कंठस्नान घातल्यानंतर विजय यांच्यासह चौघे जवान शहीद झाले.
====================================
मी मोदींपेक्षा अधिक मोठा देशभक्त: केजरीवाल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मी अधिक मोठा देशभक्त असल्याचे दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आओप) मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील (जेएनयु) खऱ्या देशद्रोह्यांना अटक करुन भारतीय जनता पक्षास (भाजप) जम्मु काश्‍मीरमधील मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षास (पीडीपी) दुखवायचे नसल्याची टीका केजरीवाल यांनी यावेळी केली. 
"माझ्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी दलित, गरीब आणि मागासलेल्या वर्गासाठी संघर्ष करत आहे; म्हणूनच मी भाजपसाठी देशद्रोही ठरलो आहे. मात्र माझा आवाज दडपता येणार नाही. मी त्यांच्यासाठी लढतच राहिन. मी मोदीजींपेक्षा मोठा देशभक्त आहे,‘‘ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 
जेएनयुमध्ये देशहद्रोही घोषणा देणारे हे काश्‍मिरी असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. ""या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यास मुफ्तींना राग येईल या भीतीने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. सीमारेषेवर आपले जवान रोज हुतात्मा होत आहेत आणि मोदी काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करावयाचे असल्याचे देशद्रोही घटकांना पाठिंबा देत आहेत,‘‘ असे केजरीवाल म्हणाले.
====================================
औरंगाबादच्या गणेश दुसारीयाने पटकाविला मराठवाडा श्री किताब 


नांदेड,दि.२९- येथील नृसिंह विद्यामंदिराच्या मैदानात काल रविवारी (दि.२८) मराठवाडा श्री ही शरिरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. पाच गटातील विजेत्यांशी झालेल्या अटीतटीच्या झुंजीत औरंगाबादच्या गणेश दुसारियाने आपल्या गटाच्या विजेतेपदाबरोबरच अंतिम विजेतेपद पटकावून सलग दुस-यांदा मराठवाडा श्रीचा बहुमान पटकाविला.
कबिर क्रीडा मंडळ व सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाच्यावतीने आयोजित 'मराठवाडा श्री' या शरिरसौष्ठव स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. स्पधेचे उद़घाटक मनपा आयुक्त सुशिल खोडवेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशदादा गायकवाडमनिष कावळेप्रा. दत्ताहरी धोतरेसामाजिक कार्यकर्ते फारुखभाईआरएमआर कंपनीचे रणदीपविठ्ठल पाटील डकरवि गायकवाडसुरेश मानधने आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा श्री स्पर्धेचे संयोजक साहेबराव सोनकांबळे यांनी केले.
            स्पर्धेचा अंतिम निकाल असा आहे, गट क्र.१ - प्रथम - प्रदीप सरगम (जालना)द्वितीय -कृष्णा पुंड (नांदेड)तृतीय-तुकाराम कल्याणकरचतुर्थ असिफ बेग (औरंगाबाद)गट २ - प्रथम - मो. मुजीब (औरंगाबाद)द्वितीय बुटासिंग (नांदेड)तृतीय सनीपारचा (जालना)गट 3 - प्रथम-शोयेब खान(नांदेड)द्वितीय- मो. जैद (औरंगाबाद)तृतीयःमोईज अहमद (नांदेड)चतुर्थःशुभम गायकवाड (जालना). गट-4 साठी औरंगाबाद येथील चौघेही स्पर्धकांना विजेतेपद मिळाले. यामध्ये गणेश दुसारीया प्रथम आला तर त्याच्यासह द्वितीय-अलताफ खानतृतीय-हसन अब्बासचतुर्थ-शेख जुनेद. गट5- प्रथम- वैभव मंकेवार (जालना)द्वितीय- नंदु रेड्डी (औरंगाबाद)तृतीय राजेश पाटील (जालना)चतुर्थः सिध्दीकी इकबाल (औरंगाबाद).
            या स्पर्धेचे सूत्रसंचालन संदिप धोंडू पाटील यांनी केले तर पंच म्हणून राज परदेसीप्रा. इम्तियाजखान तसेच दीपकसिंह रावतअब्दुल माजीद,महमद अजहर हुसैनरमेश भोसले काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  श्याम सावंतविजय सरपातेराजू जोंधळे, माधव चित्तेभीमराव धम्माकरराहूर वडजकरसिध्दार्थ जावळेअमोल मोरेशेख वसीमशेख बासीनबंटी सूर्यवंशीरामा चितोरेमारोती शिंदेअरुण कांबळे आदिंनी पुढाकार घेतला.
====================================
नांदेड डासमुक्‍तीचा पॅटर्न कोल्‍हापूर जिल्‍हयात राबविण्‍यात येणार 

नांदेड,29- टेंभूर्णी गावाने निर्माण केलेला डासमुक्‍तीचा नांदेड पॅटर्न आता कोल्‍हापूर जिल्‍हयाने राबविण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी व स्‍वच्‍छता विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी दिली आहे.  
      कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेचे अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी व ग्रामसेवक यानी नांदेड‍ जिल्‍हयामधील डासमुक्‍त अभियानातील गावांची पाहणी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी केली, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या टिमला संजय भोसीकर व गट विकास अधिकारी किरण सायमोते यांनी माहिती दिली. यावेळी कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍यासह जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक विजय पाटील, गट विकास अधिकारी अप्‍पासाहेब पवार, श्रीमती पवार, डॉ. बाबासाहेब पवार, स्‍वच्‍छता तज्ञ संतोष घाटगे, विस्‍तार अधिकारी कदम, ग्रामसेवक सागर पाटील यांची उ‍पस्थिती होती.
      पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, नांदेड जिल्‍हयाचा डासमुक्‍तीचा उपक्रम स्‍तुत्‍य असून यामुळे गटारावर होणार खर्च तसेच आरोग्‍यावरील होणा-या खर्चामध्‍ये बचत होण्यास मदत होणार आहे. शिवाय ग्रामस्‍थांच्या आरोग्‍यमानातही सुधारणा होणार आहे. आता राजर्षी शाहु महाराजांच्‍या भूमित ही चळवळ ऊभी केली जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.
विशेषतः चौदाव्‍या वित्‍त आयोगाचा निधी आणि नरेगा मधून कोल्‍हापूर जिल्‍हयात सांडपाण्‍याचं नियोजन नांदेड पॅटर्न प्रमाणे राबविण्‍यात येणार असल्‍याचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी सांगीतले. लोहा तालुक्‍यातील अंबेसांगवी, कंधार तालुक्‍यातील चिखलभोसी व पानभोसी गावातील मॅजिक पिटचा या टिमने अभ्‍यास केला. यावेळी मन्‍मथ नाईकवाडे, शेख बाबू साहेब, डॉ. बालाजी पेनुरकर, गजानन नाईकवाडे, माधवराव कांबळे, विश्‍वांबर डूबूकवाड, प्रल्‍हाद आगबोटे, शिवराज पाटील गौंड, नागोराव नाईकवाडे, गंगाधर जोंधळे, लक्ष्‍मण नाईकवाडे, हरीभाऊ नाईकवाडे, प्रकाश नाईकवाडे आदींची उपस्थिती होती. 
====================================

No comments: