Saturday, 30 January 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०१-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 

१- पूर्व रशिया भूकंपाने हादरले, बसला ७ रिश्टरस्केलचा भूकंपाचा धक्का 

~~~~~~~~~~~~~~~

[राष्ट्रीय] 

२- रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : राहुल गांधी करणार उपोषण 

३- आमीर माझा मित्र पण, त्याने देशाला दुखावलय- व्यंकय्या नायडू 

४- जिल्ह्य़ात ३० तास घालवा; अमित शहांचे केंद्रीय मंत्र्यांना आदेश 

५- बीटिंग रिट्रीटच्या नयनरम्य सोहळा, शहीद जवानांना संगीतमय श्रद्धांजली 

६- अहमदनगरः शनिशिंगणापूरला महिलांना चौथऱ्यावर प्रवेश नसेल तर महिलांनी बहिष्कार टाकावा - नागरा मंजुळे, दिग्दर्शक 

~~~~~~~~~~~~~~~

[राज्य] 

७- मुंबईत वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली : सर्व्हे 

८- कोल्हापूर; गणपती उत्सवात ध्वनी प्रदूषण, 48 जणांची तुरुंगात रवानगी; कोर्टाचा निर्णय 

९- मुंबई: देवनार डम्पिंग ग्राऊंडवर भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आणि ६ वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल 

१०- पंजाब : पटियाला येथे ४ अज्ञात व्यक्तींनी कार पळवल्यानंतर हाय अलर्ट जारी  

~~~~~~~~~~~~~~~

[प्रादेशिक]

११- वर्धा: चोरीच्या आरोपामुळे विद्यार्थीनीची आत्महत्या 

१२- ठाण्यात पाणीबाणी, शनिवार-रविवारी पाणीपुरवठा बंद 

१३- अंबरनाथ; मासिक पाळीच्या त्रासामुळं तरुणीची आत्महत्या 

१४- मी निर्दोष आहे, व्हिडिओतून सत्य समोर आलं: नवाजुद्दीन सिद्दकी 

१५- नागपूर; गोलमाल है भाई सब गोलमाल है... ज्यानं अपहरण केलं, त्यानंच सोडवलं! 

१६- उत्तर प्रदेश; बीफ खाण्यास प्रवृत्त करणा-याची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धिंड 

१७- उत्तर प्रदेशमधील बरेली येथे १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या 

१८- बुलढाण्यातील मेहकर येथे भीषण अपघात, ३ ठार ५ जखमी 

~~~~~~~~~~~~~~~

[इतर]

१९- आता अंपायरही हेल्मेट घालूनच मैदानात? 

२०- 'जाणता राजा'च्या प्रयोगावेळी रंगमंचावरील बुरुज कोसळला, 3 कलाकार जखमी 

२१- जडेजानं घेतला सुपर कॅच, ज्यानं पलटली मॅच! 

२२- अरबाज खान-मलायका अरोरा यांचा घटस्फोट होणार? 

~~~~~~~~~~~~~~~

[नांदेड]

२३- विष्णूपुरी; युवा सेनेच्या आंदोलनानंतर उपप्राचार्य तडकाफडकी निलंबित 

२४- रीठ्ठा ग्रामपंचायतीचे दोन सदस्य बडतर्फ; तिसरे आपत्य झाल्याचा ठपका 

२५- नायगाव; वर्गखोलीत रासायनिक खत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली चौकशीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना १५ दिवसाची डेडलाईन 

२६- कंधार शहरातील विकास कामांच्या आड येऊ नका - चिखलीकर 

~~~~~~~~~~~~~~~

[वाढदिवस]

हेमंत कुच्चे, नितीन इंगळे, कुणा नायक, गुलाब पांढरे, पवन अग्रवाल, सिंघ मनोहर, गणेश भगत, देवू बैस, राहुल गच्चे, योगेश भगत, गोविंदराज पांमपटवार, 

~~~~~~~~~~~~~~~

आजचा सुविचार

दुख: भोगणारा भविष्यात सुखी होऊ शकतो..

पण दुख: देणारा कधीही सुखी राहू शकत नाही

(हृतिक देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)

~~~~~~~~~~~~~~~

घरांची आर्टिफिशिअल सजावट 

फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 

संपर्क- 9423785456, 7350625656 

http://goo.gl/lE9S67

*****************

नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4

++++++++++++++++++++++++++++++


मुंबईत वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली : सर्व्हे



मुंबई : राजधानी दिल्लीच्या पावलावर पाऊल टाकत मुंबईतही प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईतल्या वायूप्रदूषणाची पातळी 325 एअर क्वॉलिटी इन्डेक्स (एक्यूआय) तर संध्याकाळी 341 एक्यूआयवर पोहचली होती.
दिल्लीतल्या प्रदूषणानंही 341 चा आकडा पार केला होता. सफर प्रकल्पाअंतर्गत नऊ उपनगरांमध्ये लावलेल्या प्रदूषणमापकात झालेल्या नोंदीनुसार पहिल्यांदाच मुंबईची हवा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाली आहे.
तापमानातील बदल आणि देवनार कचरा डेपोला लागलेली आग यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मालाडध्ये हीच पातळी सर्वाधिक म्हणजे 432 एवढी आहे. त्यानंतर चेंबूरमध्ये 391, अंधेरीत 366, भांडूपमध्ये 349, बोरीवलीत 340, बीकेसीत 322 तर कुलाब्यात 311 एवढी आहे.
सर्वात कमी प्रदूषण वरळीत असून तिथं ही पातळी 211 एवढी आहे. वायूप्रदूषणाची पातळी 200 च्या वर गेल्यास ती हवा मानवी शरीरासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे या प्रदूषणाला आळा घालणं गरजेचं झालं आहे.
====================================================

वर्धा: चोरीच्या आरोपामुळे विद्यार्थीनीची आत्महत्या


वर्धा: मोबाईल चोरीच्या आरोपावरुन एका विद्यार्थीनीने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. निकिता अंडसकर असं या मुलीचं नाव असून, ती केसरीमल कन्याशाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. निकिता हीनं आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. शिक्षिकेनं आपली बाजू न ऐकताच दबाव आणल्याचा आरोप निकितानं मृत्युपूर्वी लिहिल्याला पत्रात केला आहे.
निकिताच्या आत्महत्येमुळे वर्ध्यात खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने निकिताच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
निकीताचं आत्महत्येपूर्वीचं पत्र जसंच्या तसं
आई आज माझ्या शाळेत खूप मोठी घटना घडली आहे. माझ्या मैत्रिणीचा मोबाईल चोरीला गेला आणि तिने माझ्यावर चोरीचा इलजाम टाकला. मॅडमनी मला बोलायचा चान्स दिला नाही, म्हणून मी मरत आहे. याचे इलजाम फक्त माझ्या वर्गशिक्षिका आहेत. आणि मी दोन महिन्यांपासून पैसे गोळा केले होते. ते ही त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही.
====================================================
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण : राहुल गांधी करणार उपोषण

हैदराबाद : रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी हैदराबाद विद्यापीठात निषेध करणाऱ्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी रात्री हैदराबादमध्ये पोहचले. यावेळी राहुल गांधी दोन तास विद्यार्थ्यांसोबत ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.
रोहित वेमुलाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. यावेळी आंदोलकांनी कँडल मार्च काढून रोहितला श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांनीही मेणबत्ती पेटवून रोहित वेमुलाला श्रद्धांजली दिली.
आज दिवसभर हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये करण्यात येणाऱ्या आंदोलनातही राहुल गांधी सहभागी होणार आहेत.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा हैदराबादला भेट दिली आहे. रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि हैदराबाद युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू अप्पा राव यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
रोहित वेमुलाची आत्महत्या
हैदराबाद विद्यापीठातील संशोधक रोहित वेमुलाने  17 जानेवारीला संध्याकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी स्मृती इराणींना पत्र लिहून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ हे जातीयवादी, उग्रवादी आणि राष्ट्रविरोधी राजकारणाचा अड्डा झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या पत्रानंतरच विद्यापीठ प्रशासनाने पाच विद्यार्थ्यांची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली. दलित असल्यामुळे रोहित वेमुला याला भेदाभेदीची वागणूक दिल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर रोहितने रविवारी संध्याकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
====================================================

आमीर माझा मित्र पण, त्याने देशाला दुखावलय- व्यंकय्या नायडू


पुणे: अभिनेता आमीर खान हा माझा चांगला मित्र आहे. मात्र त्याने असहिष्णुतेबाबत वक्तव्य करुन स्वत:ला आणि भारतीयांनाही दुखावलं असं, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं.
एकमेकांचा आदर न करणं आणि बहुमतानं निवडल्या गेलेल्या पंतप्रधानाचा स्विकार न करणं ही सुद्धा एक प्रकारची असहिष्णुता असल्याचं टीकास्त्र नायडूंनी सोडलं. पुण्याच्या एमआयटी इथं सुरु असलेल्या छात्र संसदेत ते बोलत होते.
‘देशामध्ये असुरक्षिततेचं वातावरण असून पत्नी किरणला आमच्या मुलांची प्रचंड काळजी वाटत असून तिने पहिल्यांदाच देश सोडून जाण्याचंही माझ्याकडून बोलून दाखवलं’, असं वक्तव्य अभिनेता आमीर खानने केलं होतं. तो रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात बोलत होता.
आमीरच्या या वक्तव्यानंतर देशभरात राळ उठली होती. आमीरवर चहुबाजूंनी टीका झाली होती. मात्र आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं आमीर म्हणाला होता.
====================================================

आता अंपायरही हेल्मेट घालूनच मैदानात?


मेलबर्न: डोक्यावर हेल्मेट घातलेले अंपायर… हे दृष्य आता नेहमीचं ठरण्याची शक्यता आहे. खास करून ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये. कारण मैदानावरील पंचांच्या सुरक्षिततेसाठी आयसीसीच आता हेल्मेट पुरवण्याच्या विचारात आहे.
भारतात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी20 विश्वचषकापासून पंच मैदानावर हेल्मेट घालून वावरताना दिसण्याची शक्याता आहे. गेल्या दोन महिन्यांत दोन पंचांना डोक्याला चेंडू लागल्यामुळं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आल्यानं आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन पंच जॉन वॉर्ड यांच्या डोक्याला चेंडू लागला होता. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या वन डे मालिकेदरम्यान पंच रिचर्ड केटलबरोंनाही दुखापत झाली होती. नोव्हेंबर 2014मध्ये इस्राएलचे पंच हिलेल अवास्कर यांचा डोक्याला बॉल लागल्यानं मृत्यू झाला होता.
त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे पंच जेरार्ड अबूद यांनी गेल्या वर्षी बिग बॅश लीगमध्ये हेल्मेट वापरण्यास सुरूवात केली. मग जॉन वॉर्ड भारत-ऑस्ट्रेलिया संघांमधल्या कॅनबेराच्या चौथ्या वन डेत डोक्यावर हेल्मेट चढवून मैदानावर उतरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचांनी हेल्मेट घालण्याची ती पहिलीच वेळ होती. पण आता इतर पंचही त्यांचं अनुकरण करू शकतात.
====================================================

ठाण्यात पाणीबाणी, शनिवार-रविवारी पाणीपुरवठा बंद


ठाणे : बारवी आणि आंद्र धरणातला पाणीसाठा खालावल्यामुळे ठाण्यात शनिवार – रविवार पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. 6 फेब्रुवारीपासून संपूर्ण जिल्ह्यात हे नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.
सध्या जिल्ह्यातील विविध शहरात पाणीकपात लागू करण्यात आलेली आहे. पण यात सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
बहुतांश ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा हा बारवी धरणातून होतो. पण गेल्या वर्षभरात झालेल्या कमी पावसामुळे या धरणातला पाणीसाठा आटलाय. सध्या जिल्ह्यातील दोन्ही महत्वाच्या धरणात ११५ दशलक्षघनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत इतक्या पाणीसाठ्यावर जिल्ह्याची तहान भागवणे अशक्य असल्याचं सांगत पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलाय.
====================================================

'जाणता राजा'च्या प्रयोगावेळी रंगमंचावरील बुरुज कोसळला, 3 कलाकार जखमी


मुंबई: मुंबईतील विलेपार्लेमध्ये जाणता राजा नाटकाचा प्रयोग सुरू असताना रंगमंचावरील काही भाग कोसळला. या दुर्घटनेत तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समजते आहे. पार्ले टिळक शाळेच्या पटांगणावर जाणता राजाचा प्रयोग सुरु असतानाच ही दुर्घटना घडली.
बाबासाहेब पुरंदरे लिखीत जाणता राजाचा प्रयोग पार्ले टिळक शाळेच्या पटांगणात सुरु असताना रंगमंचावरील एका बाजूचा बुरुज अचानक कोसळला. तिथं उपस्थित असणाऱ्या तीन कलाकारांना यामुळं दुखापत झाली असून त्यांच्यावर पार्ल्यातील बाबासाहेब गावडे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या नाटकामध्ये जवळपास 300 हून अधिक कलाकार काम करतात. या प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यात ही दुर्घटना घडली.
====================================================

जडेजानं घेतला सुपर कॅच, ज्यानं पलटली मॅच!


मेलबर्न: भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा टी-20 सामना जिंकून मालिकेवरही कब्जा केला. हा सामना भारतानं 27 धावांनी जिंकला. मात्र, एकवेळ हा सामना अतिशय अटीतटीचा झाला होता. सामन्यात कोण बाजी मारणार? याकडेच त्यावेळेस साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.
एकीकडे भारताचे अनेक खेळाडू कॅच सोडत होते. त्यामुळे कॅच प्रमाणे मॅचही भारताच्या हातून निसटणार असंच वाटत होतं. मात्र, त्याचवेळी एक मोठा उलटफेर झाला आणि भारतानं सामन्यात वापसी केली.
डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा त्यावेळी भारतीय संघासाठी धावून आला. 15व्या ओव्हरमध्ये जडेजाने स्वत:च्याच गोलंदाजीवर एक अप्रतिम कॅच घेतला. अन् मॅचचा सारा नूरच पालटला.
मोक्याच्या क्षणी स्फोटक फलंदाज शेन वॉटसनला बाद करुन जडेजानं सामना भारताच्या बाजूनं झुकवला. या कॅचबद्दल धोनीनंही जडेजाचं कौतुक केलं आहे. “जाडेजानं घेतलेला तो कॅच खूपच भारी होता. तो मॅचचा टर्निंग पॉईंट होता.”
====================================================

बीटिंग रिट्रीटच्या नयनरम्य सोहळा, शहीद जवानांना संगीतमय श्रद्धांजली


नवी दिल्ली: गेल्या 67 वर्षांची परंपरा कायम राखत यावर्षी देखील बीटिंग रिट्रीटनं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता करण्यात आली. रायसिना हिलवर झालेल्या अभूतपूर्व अशा सोहळ्यात लष्कराच्या तिन्ही दलांच्या विविध रेजिमेंट्सनी नेत्रदीपक पथसंचलन केलं.
बीटिंग रिट्रीटचं वैशिष्ट्य म्हणजे लष्कराच्या विविध बँड्सकडून सादर केल्या जाणाऱ्या देशभक्तीपर धून्स. यावर्षी पहिल्यांदाच बीटिंग रिट्रीटमध्ये लष्कराच्या बँड्सकडून शास्त्रीय संगीत सादर करण्यात आलं. यावर्षी सादर करण्यात आलेल्या 26 धून्सपैकी 20 धून भारतीय संगीतकारांनी तयार केल्या होत्या.
लष्कराच्या बँड्सच्या वाद्यातून निघणारे सूर ऐकून फक्त उपस्थितच नव्हे तर राष्ट्रपती भवन, विजय चौक, राजपथ या ऐतिहासिक वास्तू देखील मंत्रमुग्ध झाल्या. या सोहऴ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि इतर राजकीय दिग्गजही उपस्थित होते.
====================================================

मासिक पाळीच्या त्रासामुळं तरुणीची आत्महत्या


अंबरनाथ: मासिक पाळी आजही आपल्या समाजातला अस्पृश्य विषय मानला जातो. याच त्रासाला कंटाळून अंबरनाथमध्ये एक 20 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
                 अंबरनाथच्या गायकवाडपाड्यात घडलेल्या घटनेनं देशाची मान शरमेनं खाली गेली आहे. मासिक पाळीचा त्रास सहन झाला नाही म्हणून 20 वर्षाच्या सोनल गव्हर्नरनं आपलं आयुष्यच संपवलं. सोनलची घरची परिस्थिती तशी बेताचीच. मात्र, आई मोलमजुरी करुन आणि वडील एका चहाच्या दुकानात काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
सोनलला गेल्या पाच वर्षांपासून मासिकपाळीचा प्रचंड त्रास होत होता. त्या दिवसांमध्ये पोट दुखण्याचा त्रास असह्य होत होता. हा त्रास झाल्यावर ती परिसरातील डॉक्टरांकडे जाऊन तात्पुरते औषध घेत असे. मात्र, तिच्या त्रासात थोडीही कमतरता येत नव्हती. दर महिन्याच्या या त्रासामुळे ती घराबाहेर पडणे टाळत होती. क्वचितच, ती घराबाहेर पडत होती.
घरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यानं चांगल्या डॉक्टरांना दाखविणे शक्य झाले नाही. त्रास अंगावरच काढला. मात्र, हा त्रास असह्य झाल्याने अखेर या त्रासाला कंटाळून रविवारी सकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन तिनं आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
खरं तर आजही आपल्या देशातील अनेक महिलांना वापरण्यासाठी सॅनेटरी नॅपकीन मिळत नाही. हे इथलं भीषण वास्तव आहे. किमान आता सोनलच्या आत्महत्येनंतर तरी आपल्याकडील ही स्थिती बदलणार का? हा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो आहे.
जुनाट रुढी आणि परंपरांमुळं मासिक पाळी हा अजूनही अस्पृश्य विषय मानला जातो. घरात समाजात त्यावर खुलेपणानं बोललं जात नाही. शाळेतही त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात नाही. त्यामुळं महिलांची कुचंबणा होते. एसी नील्सन आणि प्लॅन इंडिया संस्थेनं केलेल्या पाहणीत मासिक पाळीबद्दल प्रचंड धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आपल्या देशात मासिक पाळी येणाऱ्या 35 कोटी महिला आहेत. त्यात ग्रामीण भागात राहणाऱ्या 75 टक्के महिलांना मासिक पाळीची शास्त्रीय माहितीच नाही. तब्बल 81 टक्के महिला मासिक पाळीच्या काळात संसर्गजन्य कपडे वापरतात, ज्यामुळं इतर रोगांना आमंत्रण मिळतं. तर 68 टक्के महिलांकडे अजूनही 5 रुपये किंमतीचा सॅनिटरी नॅपकीन वापरण्याची आर्थिक कुवत नाहीए.
विशेष म्हणजे केवळ मासिक पाळीमुळं वर्षातले 50 दिवस मुली शाळेला दांडी मारतात. 12 ते 18 वयाच्या 23 टक्के मुली फक्त मासिक पाळीच्या त्रासामुळं शाळेला कायमचा रामराम ठोकत असल्याचं समोर आलं आहे.
मासिक पाळीबद्दल असणारे बरे-वाईट समजही महिलांच्या प्रकृतीशी खेळ करतात. काही कर्मठ कुटुंबात महिलांना 4 दिवस वेगळं वागवलं जातं. या सगळ्या प्रकारामुळं त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळं मासिक पाळीला धार्मिक आणि जुनाट रुढीच्या परंपरांतून मुक्त करण्याची गरज आहे.
ज्या भारतात मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटनं अक्षरश: धुमाकूळ घातल आहे. तिथं अजूनही 23 टक्के लोकं म्हणजे 27 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात. ज्यांना रोजच्या खाण्यापिण्यासाठी झगडा करावा लागतो. त्यामुळं सॅनिटरी नॅपकीन ही अन्न-वस्त्र निवाऱ्याइतकीच निकडीची बाब आहे, हे लक्षात घेऊन सरकारनं जागरुकतेसाठी प्रयत्न करायला हवेत.
====================================================

कोल्हापूर; गणपती उत्सवात ध्वनी प्रदूषण, 48 जणांची तुरुंगात रवानगी; कोर्टाचा निर्णय


कोल्हापूर: गणपतीच्या दिवसांत कोल्हापूरकरांच्या कानाचे पडदे फाटेपर्यंत जोरजोरात साऊंड सिस्टम वाजवणाऱ्यांना न्यायालयानं चांगलीच अद्दल घडवली आहे. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या 48 जणांना 11 फेब्रुवारीपर्यंत तुरूंगाची हवा खावी लागणार आहे.
ध्वनीमर्यादा ओलांडल्याप्रकरणी न्यायालयानं विविध गणेश मंडळाच्या 48 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ध्वनी प्रदूषण कायद्यांतर्गत ही राज्यातली सर्वात मोठी कारवाई असल्याचं समजतं आहे. अटक करण्यात आलेल्यांची रवानगी कळंबा जेलमध्ये करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात कायद्यानं डॉल्बीवर बंदी असताना शिरोली परिसरात काही गणेश मंडळांनी कायद्याचं उल्लंघन करून डॉल्बी लावून धिंगाणा घातला. याविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
====================================================

मी निर्दोष आहे, व्हिडिओतून सत्य समोर आलं: नवाजुद्दीन सिद्दकी


मुंबई: सोसायटीच्या पार्किंगवरुन एका महिलेशी झालेल्या वादानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं झाल्या प्रकाराचा संपूर्ण व्हिडिओ समोर आणला आहे. त्यात आपली काहीही चूक नसल्याचा दावाही नवाजुद्दीनने केला आहे.
केवळ मला बदनाम करण्यासाठी महिलेनं मुद्दामहून खोटी तक्रार दिल्याचंही नवोजुद्दीननं म्हटलं आहे. यासंदर्भात त्यानं आज पत्रकार परिषद घेतली. काही दिवसांपूर्वी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी विरोधात एका महिलेनं वर्सोवा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.
नवाजुद्दीन या सोसायटीत आल्यापासून त्यानं पार्किंगची संपूर्ण जागा बळकावल्याचा आरोप महिलेनं केला आहे. त्यावर नवाजुद्दीनं पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला.
दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दकीवर आरोप करणाऱ्या महिलेनेही त्या दिवसाचं मोबाईल फुटेज जाहीर केलं होतं. महिलेने नवाजुद्दीवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. मात्र, फुटेजमध्ये असा काही प्रकार दिसून आला नव्हता.
====================================================

नागपूर; गोलमाल है भाई सब गोलमाल है... ज्यानं अपहरण केलं, त्यानंच सोडवलं!


नागपूर नागपूरमधील एका हायप्रोफाईल अपहरण नाट्यातील गोलमाल समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे हे शक्य झालं आहे. विशेष म्हणजे यात ज्यानं अपहरण केलं त्यानंच पैसे देऊन अपहरणकर्त्याची सुटका केली आहे.
गोलमाल है भाई सब गोलमाल है, सीधे रस्ते की एक टेढ़ी चाल है… गोलमाल चित्रपटातील या गाण्याची आठवण नागपूर पोलिसांना नक्की झाली असेल. कारण अपहरणाचं उघडकीस आलेलं एक प्रकरणच तसं आहे.
त्याचं झालं असं 11 डिसेंबर 2015 ला नागपुरातील क्रिकेट बुकी आणि बिल्डर अजय राऊत यांचं अपहरण झालं. खंडणीसाठी पाच कोटींची मागणी झाली. मग अपहृत राऊत यांच्याशीच गुंडांनी सेटलमेंट केली आणि अपहरणकर्त्यांना दोन कोटी देण्याचं ठरलं.
अपहरणकर्त्यांच्या तावडीत असलेल्या अजय राऊत यांनी स्वत:च्या सुटकेसाठी पैशांची जमावाजमव सुरु केली. दोन मित्रांना फोन करुन 75 लाख जमवले. त्यानंतर दुसरा मित्र आणि नागपुरातील कुख्यात डॉन राजू भद्रेकडे 1 कोटींची मागणी केली. राजू भद्रेही लगेच उदार झाला आणि त्यानं 1 कोटींची रक्कम अपहरणकर्त्यांना दिल्याचं सांगितलं.
काही तासात 1 कोटी 75 लाख रुपये मिळाल्यानं अजय राऊत यांची सुटका झाली. राऊत यांनी दोन दिवसात कुख्यात डॉन राजू भद्रेला एक कोटी परतही केले.
आता तुम्ही म्हणाल ही तर साधी सरळ अपहरणाची घटना आहे. यात गोलमाल काय आहे?
तर वाचकहो, गोलमाल तर पुढे आहे.
नागपुरात 1 कोटी 75 लाखांसाठी अपहरण झाल्याची माहिती नागपूर क्राईम ब्रँचला मिळाली. पोलिसांच्या तपसाचं चक्र सुरु झालं. पण कुठल्याही पोलीस ठाण्यात अपहणाच्या गुन्ह्याची नोंद नव्हती. मग पोलिसांनी अजय राऊत यांना गाठून अपहरणाची तक्रार द्यायला भाग पाडलं.
मग पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेतला. त्यांना अटक केली. पण त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे अपहरणाचा गोलमाल समोर आला.
ज्या कुख्यात डॉन राजू भद्रेनं अजय राऊत यांच्या सुटकेसाठी 1 कोटी रुपये दिले. तोच या अपहरणनाट्याचा मुख्य सूत्रधार निघाला. आहे की नाही गोलमाल?
राजू भद्रे मुख्य सुत्रधार आहे. 1 कोटी दिल्याचे सांगितले. मात्र ते कधीच दिले नाही. उलट घटनेच्या 2 दिवसानंतर अजय राऊत यांच्याकडून अपहरणकर्त्याना दिलेले 1 कोटी परतही घेतले.
नागपूरमध्ये अपहरण आणि खंडणी वसुलीच्या या नव्या पद्धतीनं पोलिसही चक्रावून गेले आहेत. याप्रकरणी 9 आरोपींपैकी चौघांना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य सूत्रधार राजू भद्रेसह पाच आरोपी अजूनही फरार आहेत.
पण अशा गोलमाल पद्धतीनं नागपुरात आणखी काही अपहरण झाले का? तसं असेल तर त्याची माहिती नक्की पोलिसांना द्या.
====================================================

अरबाज खान-मलायका अरोरा यांचा घटस्फोट होणार?


मुंबई : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अधुना अख्तर यांचा घटस्फोट झाला. फरहान-अधुनाचा घटस्फोट बॉलिवूडला धक्का होता. सिनेरसिक या धक्क्यातून सावरत नाहीत, तोच बॉलिवूडला दुसरा धक्का मिळण्याची शक्यता आहे. सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि मलायक अरोरा घटस्फोट घेण्याची शक्यता आहे.
स्पॉटबॉय डॉट कॉम या वेबसाईटच्या वृत्ताने ही बातमी दिली आहे. या वेबसाईटच्या वृत्तानुसार, अरबाज आणि मलायकामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा वाढला आहे.
स्पॉटबॉय डॉट कॉम वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी मलायका बांद्रास्थित घराला राम राम ठोकून मुलांसोबत खारमधील का अपार्टमेंटमध्ये राहण्यास गेली आहे. याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते.
मलायकाच्या अनुपस्थितीत अरबाज खानने ‘पॉवर कपल’ या टीव्हीचं होस्टिंग सुरुच ठेवलं आहे. स्पॉटबॉय डॉट कॉम वृत्तात म्हटलं आहे की, मलायक ब्रिटनमधील एका व्यवसायिकासोबत डेट करत आहे.
====================================================

जिल्ह्य़ात ३० तास घालवा; अमित शहांचे केंद्रीय मंत्र्यांना आदेश

अमित शहांचे केंद्रीय मंत्र्यांना आदेश; कार्यकर्त्यांना भेटण्याचे फर्मान भाजप अध्यक्षपदाची दुसरी कारकीर्द सुरू होताच अमित शहा यांनी केंद्रीय मंत्र्यांना कामाला लावले आहे. केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यास शहा यांनी दोन जिल्ह्य़ांचा दौरा करण्याचे फर्मान काढले आहे. प्रवासादरम्यान शासकीय कामांचे उद्घाटन, कार्यकर्त्यांच्या भेटींवर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. काहीही झाले तरी जिल्हास्थानी मुक्काम ठोकून किमान ३० तास वेळ देण्याची विशेष सूचना शहा यांनी केली आहे. भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या स्वाक्षरीचे पत्र २० दिवसांपूर्वीच मंत्र्यांना पाठवण्यात आले होते. त्यानंतरही प्रवास न केलेल्या ११ केंद्रीय मंत्र्यांना आता शहा हेच बैठकीदरम्यान ‘समज’ देणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दिवसभर प्रचार करून मुक्काम न करता रात्री आपापल्या गृहराज्यात परतणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांची शहा कानउघाडणी केली होती. एवढेच नव्हे तर हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या एका यादववंशीय व्यापाऱ्याला मंत्री व भाजप नेत्यांना केवळ निश्चित ठिकाणी सोडून परतण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मंत्र्यांना प्रचारानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्यायच उरत नसे. आता निवडणुकीची धामधूम नसताना शहा यांनी मंत्र्यांना कामाला लावले आहे. मंत्र्यांना निवासी प्रवास करण्याची तंबी देण्यात आली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढमधील आदिवासीबहुल जिल्ह्य़ांमध्ये संबंधित खात्याच्या राज्यमंत्र्यांची पाठवणी शहा यांनी केली होती. विशेष म्हणजे मंत्र्यांना ३० तास एका जिल्ह्य़ात घालविण्याचा निर्णय पक्षस्तरावरून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. सत्तास्थापनेपासून दुसऱ्यांदा २७ जानेवारीला मोदी यांनी संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. एरव्ही केंद्रीय मंत्री व स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीच या बैठकीत सहभागी होत असत. परंतु २७ जानेवारीच्या बैठकीत मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांकडूनदेखील माहिती विचारली. त्यांच्या कामकाजाची चौकशी केली. यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ बदलाची चर्चा जोरात सुरू झाली आहे. * प्रत्येक मंत्र्याकडून शहा माहिती घेणार आहेत. केंद्राने त्या-त्या राज्यासाठी मंजूर केलेली विकासकामे तसेच जिल्हास्थानी झालेल्या विकासकामांची यादीच स्थानिक खासदाराकडून मंत्री घेतात. त्यानंतर मंत्री व खासदार एकत्रितपणे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना उपस्थिती लावतात. * केंद्रीय मंत्री वादग्रस्त विधानांमध्ये जास्त काळ चर्चेत राहिल्याने शहा यांनी आता ही शक्कल लढवली आहे. 
====================================================

उत्तर प्रदेश; बीफ खाण्यास प्रवृत्त करणा-याची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून धिंड


तीन हिंदू नागरिकांना बीफ खाण्यास प्रवृत्त केल्याचा व ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यास बळजबरी केल्याचा आरोप ठेवत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीचे मुंडन करून, त्याला चपलांचा हार घालून धिंड काढली. उत्तर प्रदेशातील ओराई येथे शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात दोन तर पीडित व्यक्ती अवधेश सविता याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती झांशी विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक शरद सचिन यांनी दिली. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 
शुक्रवारी दुपारी सुमारे २०० जणांचा समूह जलाऊँ जिल्ह्यातील रणधर गावातील अवधेशच्या घरी पोचला. त्या सर्वांनी अवधेशला जबरदस्तीने घराबाहेर काढून ओराई येथे आणले. तेथे त्यांनी अवधेशचे डोक्यावरील केस तसेच भुवया व मिशा कापल्या आणि त्यानंतर त्याला चपलांचा हार घालून त्याची धिंड काढण्यात आली. पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अवधेशला नेण्याचा प्रयत्न केला असता, तेथील गर्दीने त्यांना जुमानले नाही. त्यानंतर अधिक पोलिस कुमक बोलावून अवधेशला ओराई कोतवाली पोलिस स्थानकात नेण्यात आले. 
====================================================

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर भीषण आग


मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवर आज सकाळी पुन्हा भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या तसेच ६ वॉटर टँकर्स दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जोरदार वा-यामुळे आग आणखीनच धुमसत चालली आहे. 
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर गुरूवारी पहाटे लागलेली आग शर्थीच्या प्रयत्नांनंतर शुक्रवारी संध्याकाळी आटोक्यात आली होती. मात्र शनिवारी सकाळी पुन्हा ही आग भडकली असून धुरामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 




No comments: