श्रीक्षेत्र माळेगाव, मिडीया सेंटर, 11- शेती जोडव्यवसायासाठी शेतक-यांनी पशुधनाचे पालन केल्यास अधिक उत्पन्न मिळवता येऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषि व पशुसंवर्धन सभापती दिलीप धोंडगे यांनी केले.
माळेगाव यात्रेत भरविण्यात आलेल्या पशू प्रदर्शनात त्यांनी भेट देऊन सहभागी पशूंची पाहणी करुन पशूपालकांशी संवाद साधला. लालकंधारी, हे आपल्या जिल्हयाचे वैभव असून त्याची जोपासणा करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. माळेगाव यात्रेतून एक लाख रुपयांपर्यंत चँम्पियनशिप पशूपालकांना दिली जाते. या धनाच्या जोपासण्यासाठी शेतक-यांनी पुढे येणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाच्या वतीने शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, म्हशी, शेळी व कुक्कुटपालना सारख्या योजना याचाही लाभ शेतक-यांनी घेणे आवश्यक आहे. गावस्तरावर सामुहिक पध्दतीने दुग्ध व्यवसाय केल्यास भरभराटी येऊ शकते. दुष्काळजन्य परिस्थितीत घरच्या घरी आधुनिक पध्दतीने चारा निर्मितीची पध्दत स्विकारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुरघास तयार केल्यास टंचाईच्या काळात पशूंना खाद्य म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो. तसेच आजघडीला दुष्काळजन्य परिस्थितीत जोडव्यवसाय स्विकारने काळाची गरज असून यात तरुणांनी पुढाकार घेतल्यास शेती जोडधंदयामुळे उत्पन्न मिळू शकते असेही उपाध्यक्ष दिलीप धोंडगे म्हणाले.
No comments:
Post a Comment